• Wed. Mar 11th, 2026

    रवी राणांच्या कानशिलात लावल्याचा दावा करणाऱ्या शिवसैनिकाच्या घरी बच्चू कडू, बुकेही दिला!

    रवी राणांच्या कानशिलात लावल्याचा दावा करणाऱ्या शिवसैनिकाच्या घरी बच्चू कडू, बुकेही दिला!

    अमरावती : जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील युवा स्वाभिमान पार्टीच्या दहीहंडी दरम्यान झालेल्या झटापटीत बडनेराचे अपक्ष आमदार रवी राणा यांच्या कानशिलात मारल्याचा दावा करणारे उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक महेंद्र दिपटे यांची आमदार बच्चू कडू यांनी त्यांच्या घरी जाऊन भेट घेत त्यांची विचारपूस केलीये. रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातलं वैर संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. अशावेळी रवी राणा यांच्या कानशिलात मारल्याचा दावा करणाऱ्या शिवसैनिकाची भेट घेऊन बच्चू कडू यांनी आपले इरादे स्पष्ट केले आहेत.

    अंजनगाव सुर्जी शहरात ११ सप्टेंबर रोजी युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान आमदार रवी राणा आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शिवसैनिक महेंद्र दिपटे यांच्यात वाद झाला. या वादात आमदार रवी राणा यांनी माझ्यावर चाकू हल्ला झाला, असा दावा केला. तर महेंद्र दिपटे यांनी मी आमदार राणा यांच्या कानशिलात लगावल्या, असा दावा केला. शिवसैनिक महेंद्र दिपटे यांनी १२ सप्टेंबर रोजी अमरावती येथे पत्रकार परिषद घेत घटनाक्रम सांगितला.

    या झटापटीत शिवसैनिक महेंद्र दिपटे यांची प्रकृती काहीशी खालावली होती. त्यांच्या चेहऱ्यावर जखमा व बीपी पूर्ण लो झाल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली होती. याच पार्श्वभूमीवर १८ सप्टेंबर रोजी माजी राज्यमंत्री व शिंदे गटाचे आमदार बच्चू कडू यांनी महिंद्र दिवटे यांच्या घरी जाऊन त्यांची विचारपूस करत सांत्वनपर भेट घेतली. बच्चू कडू हे जुने शिवसैनिक आहेत. नव्वदच्या काळात शिवसेना उभारीला येत असताना महेंद्र दिपटे व आमदार बच्चू कडू हे अनेक आंदोलनात सोबत असायचे. त्यामुळे बच्चू कडू यांनी महिंद्र दिवटे यांची विचारपूस करण्यासाठी त्यांच्या घरी भेट दिल्याची माहिती समोर आली आहे.

    महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षानंतर आमदार रवी राणा व आमदार बच्चू कडू यांच्यामध्ये खोके घेतल्याच्या कारणावरून चांगलाच वाद रंगला होता. हा वाद मिटवण्यासाठी हाय कमांडने मध्यस्थी केल्यानंतर बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांनी नमती भूमिका घेत विषयाला विराम दिला होता. त्यानंतर आमदार राणा व महेंद्र दिपटे यांच्यात झालेल्या वादानंतर बच्चू कडू यांनी महिंद्र दिवटे यांच्या घरी जाऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. या घटनेने जिल्ह्याच्या राजकीय गोटात एक वेगळा संदेश गेला असून विस्मरणात गेलेला रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातला वाद यानिमित्ताने पुन्हा ताजा झाला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed