मुंबईत दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येता. या काळात मोठ्या संख्येने मुंबईत भक्तगण येत असतात. प्रामुख्याने दक्षिण मुंबईतील लालबाग, परळ, खेतवाडी, गिरगाव आदी भागांत दर्शनासाठी लाखो गणेशभक्त येत असतात. यासाठी हजारो गणेशभक्तांकडून प्रामुख्याने रेल्वेमार्गाचा वापर केला जातो. मात्र रेल्वे प्रशासनाने काही दिवसांपूर्वीच शनिवारी आणि रविवारी काही मार्गांवर मेगाब्लॉक जाहीर केला होता. याचा गणेशभक्तांना मोठा फटका बसणार असल्याने हा मेगाब्लॉक रद्द करण्याची मागणी अनेकांनी केली होती.
गणेशभक्तांच्या या मागणीनंतर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मध्य रेल्वेचे व्यवस्थापकीय संचालक नरेश ललवानी यांच्यासह पश्चिम रेल्वे प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून गणेशोत्सवकाळात मुंबईतील मेगाब्लॉक रद्द करण्याची मागणी केली. रेल्वे प्रशासनाने ही विनंती मान्य केली असून गणेशोत्सवाच्या काळात तिन्ही रेल्वेमार्गांवर कोणताही मेगाब्लॉक जाहीर करण्यात येणार नाही असे कळविले आहे, अशी माहिती मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी शनिवारी ‘एक्स’वरून दिली.