बीड, दि. ३१ : गेल्या मराठवाडा मुक्ती दिनी १७ सप्टेंबर २०२५ रोजी प्रथमच बीड-अहिल्यानगर रेल्वे धावली. दिवंगत अजित दादांनी यासाठी गती देण्याचं काम केलं. याचाच पुढचा भाग म्हणून त्यांची स्वप्नपूर्ती व्हावी यासाठी यंदाच्या मराठवाडा मुक्ती दिनी बीड-पुणे रेल्वे सुरू करण्याची पूर्ण तयारी असल्याची माहिती राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधताना दिली.
आज एका बैठकीत रेल्वे विकासाबाबत स्वतंत्र आढावा घेण्यात आला. यानंतर त्यांनी पत्रकारांशी याबाबत संवाद साधला. अहिल्यानगर-परळी रेल्वे मार्गातील बीडपर्यंतचे काम झाल्यानंतर १७ सप्टेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादांच्या उपस्थितीत पहिली रेल्वे धावली आणि बीडकरांचं ४ दशकांचं स्वप्न पूर्ण झालं.
यापुढे आता वडवणीपर्यंत काम पूर्ण झालं व चाचणी देखील पार पडली आहे. त्यापासून पुढे परळी पर्यंतच्या कामास गती देण्यात आली आहे. केंद्रासमवेत याबाबत समन्वय राखून काम लवकर पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी यावेळी दिले. यासाठी राज्य सरकारतर्फे निधी कमी पडू दिला जाणार नाही असेही त्या यावेळी म्हणाल्या.
ooo
