नागरिकांच्या सार्वजनिक सुरक्षा व सोयीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पथदिवे लावले जातात. या पथदिव्यांना महावितरणकडून वीजपुरवठा केला जातो. परंतु, अनेक नगरपंचायती, ग्रामपंचायतींच्या हद्दीतील पथदिवे भरदिवसा सुरू असल्याचे निदर्शनास येते. पारंपरिक पथदिव्यांसह मोठे हायमास्टचे दिवेही भरदिवसा सुरू असल्याने विजेचा मोठा अपव्यय होतो. राज्यात पावसाने ओढ दिल्याने पाणीटंचाई निर्माण झाली असून, त्याचा परिणाम विजेच्या निर्मितीवर होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे वीजेची मागणी सातत्याने वाढत असून, त्याचे खरेदी दरही महागले आहेत. अशा परिस्थितीतही अनेक नगरपंचायती व ग्रामपंचायतींसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतील पथदिवे भरदिवसा सुरू असतात.
महावितरणने या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हद्दीतील पथदिवे केवळ सायंकाळपासून सकाळपर्यंतच सुरू ठेवावेत, दिवसा विजेची उधळपट्टी करणाऱ्या व बेकायदा वीज वापरणाऱ्या पथदिव्यांचा वीजपुरवठा तोडण्याच्या सूचना महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या मुख्य अभियंत्यांना दिल्या आहेत.