• Mon. Sep 14th, 2026
Maharashtra Weather : राज्यात दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रीय, १८ सप्टेंबरपर्यंत या भागांत बरसणार…

मुंबई : दोन दिवस गायब झालेला पाऊस पुन्हा एकदा सक्रिय होणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. १५ सप्टेंबरपासून मोसमी पाऊस पुन्हा सक्रिय होईल असा अंदाज आहे. मराठवाड्यात यावेळी विशेष पाऊस बरसेल अशी माहिती आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि भागात पाऊस सक्रिय होईल. यावेळी राज्याच्या अन्य भागातही विजांच्या कडकडाटासह पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे. १५ सप्टेंबरपासून सुरू झालेला पाऊस १८ सप्टेंबरपर्यंत राज्याच्या विविध भागात बरसेल. त्यानंतर मात्र पावसाचा जोर पुन्हा कमी होईल, असं हवामान खात्याकडून स्पष्ट सांगण्यात आलं आहे.

विदर्भात आज, बुधवारपासून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, मराठवाड्यात उद्या, गुरुवारपासून छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड येथे मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रात कोल्हापूर, जळगाव, धुळे येथेही उद्या, गुरुवारपासून मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या अधिकारी सुषमा नायर यांनी दिली. हे क्षेत्र आज, बुधवारनंतर तीव्र होऊ शकते. या क्षेत्रासह आता आयओडीही सकारात्मक होत असून या दोन्हींचा फायदा राज्याला होऊ शकतो, असे त्या म्हणाल्या.

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात निर्माण झालेली प्रणाली तीव्र न झाल्याने राज्यात फारसा पाऊस पडला नाही. या काळात जळगाव, मराठवाड्यातील काही भागांमध्ये काही प्रमाणात पाऊस पडला. मात्र अजूनही उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अधिक पावसाची गरज आहे. सध्या सांगली, सातारा, बीड या जिल्ह्यांमध्ये पावसाची मोठी तूट आहे. या आठवड्यात निर्माण झालेल्या प्रणालीचा फायदा महाराष्ट्राच्या अंतर्भागात होऊ शकतो, असेही नायर यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed