• Sat. Sep 21st, 2024

उपोषणाची कोंडी फोडण्याच्या हालचालींना वेग, रात्री उशिरा एकनाथ शिंदेंचा मनोज जरांगेंना फोन

उपोषणाची कोंडी फोडण्याच्या हालचालींना वेग, रात्री उशिरा एकनाथ शिंदेंचा मनोज जरांगेंना फोन

जालना: मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देण्याच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मंगळवारी मंगळवारी रात्री फोनवरुन चर्चा झाली. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या मध्यस्थीने ही चर्चा झाली असून जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकमेकांशी थेट बोलणार असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले.

उद्योगमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी रात्री अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी मंत्री संदीपान भुमरे, आमदार राजेश टोपे, माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आमदार नारायण कुचे उपस्थित होते. यावेळी मराठा समाजाचे पदाधिकारी आणि जरांगे यांच्यात जवळपास दोन ते अडीच तास चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मनोज जरांगे या दोघांमध्ये मोबाईलवर चर्चा झाली. चर्चेचा नेमका तपशील कळाला नसला तरी झालेली चर्चा ही मराठा आरक्षणावर शासन कसे सकारात्मक आहे यावर झाली असावी, असा अंदाज बांधला जात आहे.

मध्यरात्री ‘ती’ महिला दोन महिन्यांच्या लेकराला घेऊन आली, मनोज जरांगेंचं मन द्रवलं, सलाईन लावायला होकार

समाजाला आरक्षण देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सकारात्मक असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितले. जरांगे यांनी त्यांची भूमिका मुख्यमंत्र्यांसमोर मांडली आहे. त्यांचा काही निरोप असेल तर मी त्यांना देईन. त्यांचे उपोषण सुटले पाहिजे,त्यांची प्रकृती चांगली राहिली पाहिजे, अशी शासनाची भूमिका आहे. कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठीच ३० दिवसांचा कालावधी मागितला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे यासाठी आम्ही सर्वजण राजकारण बाजूला ठेवून काम करीत असल्याचेही सामंत म्हणाले. पहिल्या समितीने काम केले नाही,पहिले तीन महिने वाया गेले. एक महिन्याचा वेळ आम्ही दिला आहे. आता आम्ही आमरण उपोषण सोडून साखळी उपोषण करू, असे मुख्यमंत्री शिंदे यांना सांगितल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले. मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्या सकाळी सांगतो असा निरोप दिल्याचेही जरांगे यांनी सांगितले.

सरकारला महिन्याची मुदत

‘संपूर्ण मंत्रिमंडळाने अंतरवाली सराटी (ता. अंबड, जि. जालना) येथे येऊन मराठा आरक्षणाबाबत लेखी आश्वासन द्यावे, राज्यभरातील सर्व मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र द्यावे, तरच बेमुदत उपोषण सोडू,’ अशी भूमिका आंदोलक मनोज पाटील जरांगे यांनी मंगळवारी रात्री जाहीर केली. जरांगे यांनी सरकारला महिनाभराची मुदतही देण्याची तयारी दर्शविली.

जरांगे म्हणाले, ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळाने शिंदे समितीचा अहवाल सकारात्मक अथवा नकारात्मक कसाही असला, तरी महिनाभरात संपूर्ण महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजास कुणबी प्रमाणपत्र द्यावे, सर्व आंदोलकांवरील गुन्हे तत्काळ मागे घ्यावेत, लेखी कालबद्ध कार्यक्रम द्यावा या अटीवरच उपोषण सोडू मात्र, साखळी उपोषण याच मंडपात सुरू ठेवू.’

मनोज जरांगेंच्या आंदोलनात संभाजी भिडेंची एन्ट्री होताच नूरच पालटला; खोतकर-भुमरेंकडून झटक्यात सूत्रं हाती घेतली

‘आंदोलनातील दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. तीन मोठे अधिकारी निलंबित केले आहेत. आता आंदोलनाचे मूळ असलेले मराठा आरक्षण मिळणे बाकी आहे. त्याबाबतचे पत्र शेवटच्या बांधवाला जाईपर्यंत आंदोलन करीत राहू,’ असेही जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.

आयुष्यभर टिकणारे आरक्षण मिळविण्याचे आश्वासनही जरांगे यांनी या प्रसंगी आंदोलकांना दिले. ‘कुणबी प्रमाणपत्र मिळेपर्यंत येथून हलणार नाही. आंदोलन कायम ठेवू. महाराष्ट्रातही आंदोलन कायम ठेवावे. तोपर्यंत साखळी आंदोलन कायम राहील,’ असेही जरांगे यांनी सांगितले.

उपोषण सोडताना मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दोन्ही राजे आले पाहिजेत, जरांगे पाटलांच्या पाच मागण्या

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed