कोल्हापूर येथील एका जाहीर कार्यक्रमात शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर यांनी हा गौप्यस्फोट केल्याने एकच खळबळ उडाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या तिकीटासाठी मला मनोहर जोशी यांनी मातोश्रीवर जाण्यास सांगितले होते. ज्यावेळी मी मातोश्रीवर गेलो त्यावेळी तुमचे तिकीट मनोहर जोशी यांनी कापले, असे मला सांगण्यात आले. त्यामुळे तुम्ही त्यांच्या घरावर हल्ला करा, असा निरोप मला मिलिंद नार्वेकर यांनी दिला. त्यानंतर संजय राऊत यांनी मला फोन केला. त्यावेळी संजय राऊत मला म्हणाले की, मनोहर जोशी यांच्या घराजवळ जाताना पेट्रोल पंप लागतो, तिथून पेट्रोल घेऊन त्यांचे घर पूर्ण जाळून टाका, काही शिल्लक ठेऊ नका, असे सांगितले. त्यामुळेच आपण मनोहर जोशींच्या घरावर हल्ला केला, मातोश्रीचा आदेश आम्ही पाळला, असे सदा सरवणकर यांनी सांगत एकच खळबळ उडवून दिली.
उद्धव यांना आमदारांसाठी वेळ नव्हता…
विधानसभेच्या उमेदवारीसाठी माझ्याकडे दहा कोटी रुपयांची मागणी केली होती, असा आरोपही त्यांनी केला. मी १० कोटी रुपये देऊ शकत नसल्याने आदेश बांदेकर यांना मातोश्रीतून उमेदवारी देण्याचा प्रयत्न सुरू झाला, असे ते म्हणाले. शिवसैनिकांची कोंडी करण्याची आणि त्यांना जाळ्यात अडकविण्याचे काम बाळासाहेबांच्या काळात कधी झाले नाही. राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार आल्यानंतर उद्धव ठाकरेंना आदित्य ठाकरे यांना मोठे करायचे होते. तेव्हा ठाकरे आमदारांच्या चेहऱ्याकडेही पाहायचे नाहीत. अनेकांना त्यांची भेट मिळत नसल्याने शिवसैनिकांनी शिंदे यांच्या नेतृत्त्वाला साथ दिली, असेही सरवणकर यांनी नमूद केले.