• Sat. Mar 14th, 2026

    पाणी कपात तातडीने नको; लातूर MIDCबाबत अमित देशमुख यांची उद्योगमंत्र्यांना विनंती

    पाणी कपात तातडीने नको; लातूर MIDCबाबत अमित देशमुख यांची उद्योगमंत्र्यांना विनंती

    लातूर : ‘पावसाने उघडीप दिल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. असे असले तरी लातूर व परिसरात परतीच्या मान्सूनचा पाऊस चांगला पडतो, असा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे लातूर एमआयडीसीतील पाणीपुरवठ्याची कपात करण्यापूर्वी परतीच्या मान्सूनची वाट पाहावी,’ अशी विनंती आमदार अमित देशमुख

    यांनी उद्योग मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे. या मागणीला सामंत यांनी अनुकूल प्रतिसाद दिल्याची माहिती देण्यात आली.

    आमदार अमित देशमुख यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन त्यांच्याशी विविध मागण्यांबाबत चर्चा केली. ‘लातूरच्या औद्योगिक, शैक्षणिक, कृषी विकासासाठी अत्यावश्यक असलेली लातूरची विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाची परवानगी मिळण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या जमिनीचे अधिग्रहण करून विमानतळावरील उर्वरित कामे त्वरित पूर्ण करण्यात येतील,’ असे आश्वासन उदय सामंत यांनी दिले.

    लातूर एमआयडीसी विस्तारासाठी जमिनीचे अधिग्रहण, एमआयडीसीअंतर्गत रस्त्यांची दुरुस्ती, उद्योगांसाठी पाणीपुरवठा त्याचबरोबर लातूर विमानतळावरील विमानसेवा पुन्हा सुरू करावी आदी मागण्या देशमुख यांनी केल्या. येथील विमानतळावरून नियमित विमानसेवा सुरू होणे आवश्यक आहे. लातूरच्या विमानतळावरील विमानसेवेला एअरपोर्ट अॅथॉरिटी ऑफ इंडियाची पुन्हा परवानगी मिळण्यासाठी या विमानतळाच्या संरक्षण भिंतीचे काम पूर्ण होणे आवश्यक आहे. नऊ हेक्टर जमिनीचे अधिकरण केल्यानंतरच या संरक्षण भिंतीचे काम पूर्ण होणार आहे. त्यामुळे सदरील जमिनीचे अधिग्रहण सक्तीने करण्यात यावे, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. ‘या जमीन अधिग्रहणाला मंजुरी देऊन विमानतळावरील उर्वरित कामे त्वरित पूर्ण करण्यात येतील, ’असे आश्वासन सामंत यांनी दिले. तिसऱ्या टप्प्यातील एमआयडीसी विस्तारासाठी जमिनीचे अधिग्रहण गरजेचे आहे. नवीन उद्योग उभारणीसाठी जागेची उपलब्धता व्हावी म्हणून लातूर एमआयडीसीच्या तिसऱ्या टप्प्यातील विस्तारासाठी चाटा, भोयरा परिसरातील जमिनीचे आवश्यकतेनुसार अधिग्रहण करण्यात येईल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले.
    ठाण्यात १ सप्टेंबरपासून नवे पर्व; ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ मोहिमेंतर्गत स्वच्छताकामात मोठे बदल
    लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी येथे नवनवीन उद्योग उभारणीला चालना देणे आवश्यक आहे. येथील नैसर्गिक परिस्थिती लक्षात घेता लातूर , उस्मानाबाद, बीड या जिल्ह्यांमध्ये कमी पाण्यावर चालणाऱ्या उद्योगांच्या उभारणीसाठी प्रोत्साहन द्यावे, वैद्यकीय क्षेत्रात लागणारी मशनरी व अवजारे तयार करणारी कारखानदारी येथे प्राधान्याने उभारण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. उद्योगमंत्र्यांनी मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे सांगण्यात आले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed