• Sat. Sep 21st, 2024

मीरा-भाईंदर ते वसई-विरारपर्यंत सायबर फसवणुकीचे जाळे; भामट्यांनी लुबाडे करोडो, आकडा वाचून धक्का बसेल

मीरा-भाईंदर ते वसई-विरारपर्यंत सायबर फसवणुकीचे जाळे; भामट्यांनी लुबाडे करोडो, आकडा वाचून धक्का बसेल

म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर : बँकेचे क्रेडिट कार्ड अपडेट करणे व इतर पद्धतींनी ऑनलाइन आर्थिक फसवणीक झाल्याच्या तब्बल दोन हजार तक्रारी मागील आठ महिन्यांत मिरा-भाईंदर वसई-विरार पोलिसांकडे दाखल झाल्या आहेत. या फसवणुकीची एकूण रक्कम तब्बल सुमारे दहा कोटींच्या घरात असल्याचे सांगितले जाते. आतापर्यंत यातील केवळ एक कोटींची रक्कम फसवणूक झालेल्यांना परत करण्यात पोलिसांच्या सायबर शाखेला यश आले आहे.

जानेवारी ते ऑगस्ट अशा आठ महिन्यांच्या कालावधीत मिरा-भाईंदर व वसई-विरारमधील तब्बल एक हजार ९५२ जणांच्या ऑनलाइन फसवणुकीच्या तक्रारी पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. यात आधार कार्ड बँक खात्याशी जोडणे, क्रेडिट कार्ड अपडेट करणे, ऑनलाइन वीज देयके भरणे आदी कारणे पुढे करून फसवणूक करण्यात येत आहे. ऑनलाइन खरेदी करतानाही फसवणूक झाल्याच्या तक्रारी आहेत.

सायबर शाखेने दिलेल्या माहितीनुसार, फसवणुकीची एकूण रक्कम सुमारे १० कोटींच्या घरात आहे. पोलिसांनी मागील काही महिने विविध तांत्रिक पद्धतींनी तपास करत, ६५ जणांच्या फसवणुकीचे एक कोटी एक लाख रुपये संबंधित बँक खात्यांमध्ये परत केले आहेत. यामध्ये काही जणांची परदेशी नागरिकांकडून फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले आहे. गेल्या वर्षी फसवणूक झालेल्यांचे ९१ लाख रुपये परत मिळाले होते.

पोलिसांना प्राप्त झालेल्या फसवणुकीच्या तक्रारींच्या तुलनेत परत मिळालेली रक्कम अवघी काही टक्के आहे. परिणामी, ऑनलाइन फसवणुकीला बळी पडलेले शेकडो तक्रारदार आपले पैसे परत मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. दुसरीकडे अशा सायबर गुन्ह्यांच्या संख्येत दिवसागणिक भरच पडत आहे. या पार्श्वभूमीवर, आता ऑनलाइन फसवणुकीच्या प्रकरणांचा तपास जलदगतीने करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे .
वाहने भाडेतत्त्वावर देताय? सावधान; मुंबईतील घटनेने डोळे उघडतील, मोठी गॅंग पोलिसांच्या ताब्यात
तात्काळ तक्रार दाखल करा

ऑनलाइन फसवणूक झाल्याचे अनेकदा संबंधितांना खूप उशिरा लक्षात येते. परिणामी तक्रार दाखल करण्यास उशीर होतो. त्यामुळे अनेकदा तपासात अडथळे येतात. त्यामुळे नागरिकांनी फसवणूक झाल्यानंतर, काही तासांतच तात्काळ तक्रार दाखल करायला हवी. त्यामुळे पैसे परत मिळवून देण्याची शक्यता वाढते, असे शाखेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. आर्थिक फसवणूक टाळण्यासाठी जनजागृतीचे कामदेखील पोलिस आयुक्तालयाकडून केले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed