शेतीसह अन्य उपयोगांसाठी वापरले जाणारे जंतूनाशक भारतात महाग आहे. चीनमध्ये ते स्वस्त दरात मिळते. मात्र चीनहून भारतात आयात करण्यासाठी त्यावर १० ते २० टक्के आयात शुल्क विविध श्रेणींमध्ये भरावे लागते. मात्र दुबईहून हे औषध आयात केल्यास ठराविक प्रकारच्या सवलती मिळतात. यामुळेच काही व्यापारी छुप्या पद्धतीने चीनची जंतूनाशक औषधे दुबईमार्गे छुप्या पद्धतीने आयात करीत होते. ही चोरी पकडण्यात आली आहे.
संबंधित सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डीआरआय मुंबईच्या चमूने मुंबईत आयात मालाची तपासणी केली असता, त्यामध्ये १५ टन जंतूनाशक औषधे होती. हा माल शाग्रिका इम्पोर्ट अॅण्ड एक्स्पोर्ट कंपनीने आयात केला होता. या माध्यमातून १० कोटी रुपयांच्या सीमा शुल्काची चोरी करण्यात आली होती. या प्रकरणात भाविक दंड, राजन भानुशाली व दिनेश भानुशाली यांनी आयात-निर्यात परवाना नसताना त्यासंबंधीच्या कोडचे बेकायदा आदान-प्रदान केले. त्या माध्यमातून ही करचोरी झाल्याचे समोर आले आहे. डीआरआय मुंबईने त्यांना अटक केली आहे.
वापर कशासाठी, याचा तपास करणार
जंतूनाशकाद्वारे आयात शुल्काची चोरी होण्याचे हे पहिलेच प्रकरण समोर आले आहे. यामुळे मुंबई हा या प्रकारच्या औषधांच्या काळा बाजाराचा हब झाला आहे का, याचाही आता डीआरआयकडून तपास सुरू आहे. त्याचवेळी जंतूनाशक औषधांत रसायने असतात. या रसायनांचा घातक कृत्यांसाठी वापर होतो आहे का, याचाही तपास केला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.