महाराष्ट्रात कशी स्थिती राहणार?
जी. पी. शर्मा यांनी महाराष्ट्रात पुढच्या दोन आठवड्यांमध्ये मान्सून कमजोर राहू शकतो, असा अंदाज वर्तवला आहे. मुंबईमध्ये देखील ही स्थिती राहू शकते, असं ते म्हणाले. महाराष्ट्र आणि दख्खनच्या पठारावर पुढील दहा दिवसांमध्ये सरासरी पेक्षा कमी पाऊस होऊ शकतो, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
डॉ. अक्षय देवरस यांनी मान्सूनचं पूर्ण क्षमतेनं कमबॅक ऑगस्ट मध्ये होण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं आहे. ऑगस्ट महिन्यात पाऊस डोंगराळ भागत होऊ शकतो त्याशिवाय तो उत्तर आणि उत्तर पूर्व म्हणजेच ईशान्य भारतातील राज्यांमध्ये होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला आहे.
संपूर्ण देशभरात १ जून पासूनच्या पावसाच्या आकडेवारीचा विचार केला असता जी तूट आहे ती एलनिनो आणि वातावरणातील बदलत्या संरचनामुळं वाढू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे. महाराष्ट्रात ऑगस्ट महिन्याच्या अखेरपर्यंत मान्सूनचा ब्रेक कायम राहू शकतो, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात जुलै महिन्यात जोरदार पावसानं हजेरी लावली होती. जून महिन्यात आणि ऑगस्ट महिन्यात पावसानं ब्रेक घेतलेला आहे. यामुळं राज्यातील विविध जिल्ह्यातील धरणांमध्ये पाणीसाठी गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे. नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये सरासरी ६४ टक्के पाणी साठा आहे. नाशिक जिल्ह्यात गतवर्षीच्या सरासरीच्या तुलनेत कमी पावसाची नोंद झाली आहे. तर दुसरीकडे पावसाचं कमबॅक झालं नाही तर ज्या शेतकऱ्यांकडे जलसिंचनाची सोय आहे त्यांनी पिकांना पाणी द्यावं, असं आवाहन देखील करण्यात आलेलं आहे. ज्या शेतकऱ्यांकडे जलसिंचनाच्या सोयी उपलब्ध नाहीत त्यांच्यापुढं मात्र अडचणी निर्माण होऊ शकतात.