• Thu. Mar 19th, 2026
    ४ दिवसात २७ मृत्यू, CM शिंदेंची छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाला भेट; सांगितली सत्य परिस्थिती

    ठाणे: कळवा येथील ठाणे पालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात गुरुवारपासून आज सोमवारपर्यंत २७ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या बुधवारी या रुग्णालयात ५ जणांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर काल म्हणजेच रविवारी १८ जणांच्या मृत्यूने एकच खबळ उडाली आणि आज पुन्हा ४ जणांचा मृत्यू झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयाला भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला.

    रुग्णालयात काल रविवारी झालेल्या १८ मृत्यू नक्की का झाले आणि कोणत्या परिस्थितीत झाले याची माहिती त्यांनी यावेळी जाणून घेतली. तसेच कार्यपद्धतीमध्ये बदल करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. ठाणे महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिदल, अति. आयुक्त संदीप माळवी, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉ.माळेगावकर, इत्यादी अधिकारी उपस्थित होते.

    Breaking News: पालिका रुग्णालयातील मृत्यूचे सत्र सुरूच; एक महिन्याच्या बाळासह चार रुग्णांचा मृत्यू
    रुग्णालयाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकाराशीं संवाद साधला. रुग्णालयात झालेल्या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश कालच दिले आहेत. यासंदर्भात २५ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. वस्तुस्थिती पाहिली जाईल आणि त्यानंतर जी कारवाई करायची आहे ती केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. रुग्णालयावर लोकांचा विश्वास देखील आहे आणि त्याच बरोबर लोड देखील आहे. कालची घटना झाल्यानंतर देखील ९१ रुग्णांना अॅडमिट करून घेतले तर २२ रुग्णांवर शस्त्रक्रिया झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

    रुग्णालातील लॉबीमध्ये बेड टाकून उपचार सुरू आहे, इतका लोड असल्याचे शिंदे म्हणाले. अनेक रुग्णांवर महाग इंजेक्शन देऊन उपचार सुरू आहेत. मी रुग्ण आणि नातेवाइकांशी बोललो, त्या सर्वांनी उपचारावर समाधान व्यक्त केले. डीन आणि आयुक्तांशी चर्चा केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. रुग्णालयात खासगी हॉस्पिटलमधून देखील रुग्ण आले आहेत. सध्या इतके रुग्ण आहेत की नवीन रुग्णांसाठी जागा नाही. जिल्हाधिकाऱ्यांना येथे रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यास सांगितली आहे. तसेच त्याचा खर्च रुग्णांकडून घेऊ नये असे आदेश दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. काल रविवारी झालेल्या १८ मृत्यूची कारणे वेगवेगळी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed