• Sat. Sep 21st, 2024
ठाण्याच्या रुग्णालयातील घटनेवर एकनाथ शिंदेंनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले- अहवालानुसार कारवाई होणार

सातारा: छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, ठाणे येथे झालेली घटना दुर्दैवी असून याबाबत सकाळीच माहिती घेतलेली आहे. यासाठी आरोग्य यंत्रणेला सूचना दिलेल्या आहेत. ही घटना शासनाने अत्यंत गांभीर्याने घेतली असून सखोल चौकशी करण्यासाठी आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली जाईल. त्यातून जो अहवाल येईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
Thane News: ठाण्यात धक्कादायक घटना: पालिका रुग्णालयात २४ तासांत १७ जणांचा मृत्यू, अनागोंदीने जीव गेल्याचा आरोप
सातारा जिल्ह्यातील दरे येथे माध्यम प्रतिनिधींजवळ ते बोलत होते. यावेळी उत्पादन शुल्क मंत्री आणि ठाणे तसेच सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची प्रमुख उपस्थिती होती. ठाणे येथील रुग्णालयात एकाच रात्रीत घडलेल्या १८ रुग्णांच्या मृत्यूची घटना दुर्दैवी आणि वेदनादायी असल्याचे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, रुग्णालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार यातील काही रुग्ण हे अत्यंत गंभीर स्थितीत दाखल झाले होते. काही रुग्ण खाजगी रुग्णालयातूनही संदर्भीत झाले होते. वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराने वेगवेगळ्या दिवशी हे रुग्ण याठिकाणी दाखल झाले होते. या अत्यंत वेदनादायी घटनेबद्दल आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याशीही बोलणे झाले असून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई आरोग्य यंत्रणेच्या सातत्याने संपर्कात आहेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

कितीही काम करा, नशीब असेल तरच माणूस निवडून येतो; गुलाबराव पाटलांची फटकेबाजी

याबाबत बोलताना आरोग्य मंत्री तानाजी सावंत म्हणाले की, रुग्णांकडे दुर्लक्ष झालं आहे का? ही बाबही अहवाल आल्यावर स्पष्ट होईल. जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी आहे. पुरोगामी महाराष्ट्रात या अशा प्रकारच्या घटना घडणं सर्वसामान्यांच्या आरोग्याची हेळसांड करणं हे माझ्यासारखा मंत्री मुळीच सहन करणार नाही. ज्यावेळी अहवाल येईल, त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने योग्य ती कारवाई केली जाईल. घटना मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात घडली की गडचिरोलीला घडली की चंद्रपूरला घडली. यामध्ये कुणीही पडू नये. सगळे महाराष्ट्राचे नागरिक आहेत. त्यांची जबाबदारी ही शासनाची आहे. आम्ही शासन म्हणून जबाबदारी घेतली आहे. या घटनेच्या मुळाशी आम्ही जात आहोत. ज्या कुणामुळे घडलं असेल त्यावर कारवाई केली जाणारच, असं तानाजी सावंत यांनी जाहीर केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed