Dadar-Ratnagiri Express: मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असली तरी वर्षानुवर्ष कोकणवासियांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आलं आहे. कोरोनो काळात बंद झालेली दादर-रत्नागिरी गाडी आता परत सुरू होणार नाही हे स्पष्ट झाले आहे.
कोरोना काळात एक्सप्रेस बंद
मुंबईतील दादरवरून रत्नागिरी मध्ये येण्यासाठी ही एकमेव गाडी सुरू होती ती कोरोना कालावधीत बंद करण्यात आली तेव्हापासून ती गाडी आजवर सुरू करण्यासाठी अनेकदा पाठपुरावा करण्यात आला. मात्र दादर रत्नागिरी गाडी अद्याप सुरू होऊ शकलेली नाही. दादर-रत्नागिरी गाडीला मोठी मागणी आहे मात्र या मागणीची दखल अद्याप रेल्वे प्रशासनाने घेतलेले नाही. सध्या त्याऐवजी दिवा-रत्नागिरी पॅसेंजर एक्सप्रेस सोडण्यात येते. पण दादर हे मुंबईच्या केंद्रस्थानी असून या स्थानकावर पोहोचणे मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील प्रवाशांसाठी सोपं आहे.
दादर रत्नागिरी गाडी ज्या वेळेला बंद करण्यात आली त्यावेळेला लोकल गाड्यांना अडथळा होत असल्याचे प्राथमिक कारण देण्यात आलं होतं. खासदार रविशंकर शुक्ला यांना दिलेल्या पत्रात दादर गोरखपुर ही गाडी आता नियमित स्वरूपात करण्यात आल्याचे स्पष्ट झाल आहे. यापूर्वी ही गाडी हंगामी स्वरूपात चालवली जात होती. महाराष्ट्रातील गाड्यांना दादर रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म उपलब्ध नाही किंवा कोणत्याही तांत्रिक कारण देत कोकणात येणारी गाडी बंद करण्यात आली मात्र महाराष्ट्र बाहेर उत्तर प्रदेशात जाणाऱ्या गाडीला वाट करून देण्यात येत असल्याने कोकणवासियांमध्ये नाराजी असल्याचं मत रेल्वेचे अभ्यासक अक्षय महाबदी यांनी व्यक्त केल.
दादर-रत्नागिरी सेवा बंद करण्यामागचं कारण काय?
मिड डमधील ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र अक्लेकर यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये या मागील कारण स्पष्ट केलं आहे. मध्ये रेल्वेवर दादर-रत्नागिरी एक्सप्रेस चालवताना एक ऑपरेशनल अडचण येते. कोकणातून येणारी ही एक्सप्रेस जेव्हा दिवा आणि विद्याविहार स्थानकांजवळ मुंबईतील उपनगरिय रेल्वे मार्गांवर प्रवेश करते तेव्हा एकाच वेळी सुमारे सहा लोकल थांबतात. अप आणि डॉऊन या दोन्ही मार्गांवर प्रत्येकी तीन लोकल थांबवल्या जातात. यामुळे लोकलचं वेळापत्रक विसकळीत होतं. यामुळे हा निर्णय घेण्यात आला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे.
