गणेशवाडी (ता. कर्जत) येथील या युवतीने पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, माझे मामा बापुसाहेब गोपीनाथ कायगुडे (रा. गणेशवाडी) यांनी ३० जुलैला आई-वडील, भाऊ आणि बहीण शेतावर गेलेले असताना घरी येऊन मारहाण केली. मी आणलेल्या स्थळांना तू नकार का देत आहेस, असं म्हणत लोखंडी पाईपाने आणि लाकडी दांडक्याने पाठीवर, मांडीवर आणि डोक्यावर जबर मारहाण केली. तेवढ्यात गावातील काही लोक मदतीला धावल्याने माझी सुटका झाली. मामाचा मला कुठे तरी लग्नाच्या आमिषाने विकण्याचा प्रयत्न होता आणि ते माझ्या आई-वडिलांना समजल्यामुळे आम्ही त्या स्थळांना वारंवार नकार देत होतो. त्यामुळे त्याने मला ही मारहाण केली आहे, असं पीडितेने सांगितलं.
त्यानंतर आम्ही सरकारी रुगणालयात उपचारासाठी गेलो. तेथून कर्जत पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यासाठी गेलो. तेथील ठाणे अंमललदाराने आमचे एकूण घेतले आणि नंतर मामाला फोन करून बोलावून घेतले. नंतर त्या दोघांमध्ये बाजूला जाऊन काही तरी बोलणे झाले. त्यानंतर माझ्याकडून कोऱ्या कागदावर सह्या घेण्यात आल्या. दुसऱ्या दिवशी आम्हाला कळाले की आमचे आपसांत मिटल्याचे त्यावर भासविण्यात आले होते. त्यामुळे आम्ही थेट पोलिस अधीक्षकांकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी मामाविरूद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, गंभीर मारहाण होऊनही किरकोळ कलमे लावण्यात आली आहेत. आरोपीला अटकही झाली नाही.
पोलिस घरी आले, पंचनामा करून गेले. जाताना सांगून गेले की आरोपी दिसल्यावर आम्हाला कळवा. त्यानुसार आम्ही त्यांनी दिलेल्या क्रमांकावर अनेकदा फोन केले. मात्र, उत्तर मिळाले नाही. त्यामुळे पोलिस ठाण्यात संपर्क केला. तेव्हा या गुन्ह्यात आरोपीला अटक करू शकत नसल्याचं सांगण्यात आलं. त्यामुळे आता मामा आम्हाला म्हणतो की पोलिसही मला काही करू शकत नाहीत. आम्हाला धमक्याही देत आहेत. मामा मुळातच गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्याविरूद्दध पूर्वीही वेगळे गुन्हे दाखल झाले आहेत. सध्या मी, माझी आई आणि बहीण तीन दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहोत. मला झालेली मारहाण गंभीर स्वरूपाची आहे, त्यामुळे आरोपीविरूद्ध गंभीर कलमे लावून अटक करण्यात यावी, अन्यथा आम्ही सहकुटुंब उपोषण करू, असा इशाराही देण्यात आला आहे.