• Sat. Sep 21st, 2024
Maharashtra Weather Update : राज्यावर पाऊस रूसला, मुंबईसह या भागांत दिवसा उन्हाचा चटका

मुंबई : राज्यात उशिराने दाखल झालेला मान्सून जुलैच्या अखेरच्या महिन्यात जोरदार बरसला. पण यानंतर ऑगस्टच्या पहिल्या दिवसापासूनच पावसानं विश्रांती घेतल्याचं पाहायला मिळतं. राज्यातल्या महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्येदेखील पावसानं दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. अशात पुढील काही दिवस असंच हवामान असेल, असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ऐन पेरणी हंगाम सुरू असताना पावसाने दगा दिल्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा चिंतेत सापडला आहे. अशात राज्यात १० ऑगस्टपर्यंत पावसाचा असा कुठलाही अंदाज नसल्याची माहिती आहे. तर येत्या ३ ते ४ दिवसांमध्ये हलका ते मध्यम पाऊस असेल पण कुठेही मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही.

दरम्यान, राज्यात जुलै महिन्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. पण ऑगस्ट महिन्यात मात्र पावसाने विश्रांती घेतली. यामुळे उष्णतेतही भर पडली आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि पुणे या भागांमध्ये गेल्या २ दिवसांपासून दिवसा उष्णता जाणवू लागली आहे. अशातच पुढचे काही दिवस असेल राहतील. मात्र, ऑगस्टच्या महिन्याअखेरीस पाऊस पुन्हा एकदा राज्याला भेट देईल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यामध्ये पावसाचा जोर ओसरला. जुलै महिन्यामध्ये कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीने हाहाकार माजवला. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून मात्र हा पाऊस कमी झाला. गेल्या चार-पाच दिवसांपासून पावसानं राज्यातील अनेक भागांमध्ये दडी मारली. यामुळे पेरणीची कामं रखडली असून महागाईलाही याचा फटका बसू शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed