समृद्धी महामार्गावर रस्त्याच्या बाजूला सावलीत जेवण करण्यासाठी बसलेल्या पाच कामगारांना भरधाव ट्रकने चिरडलं. या घटनेत तीन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी आहेत.
करमाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जयपूर शिवारात मेघा इंजिनिअरिंग कंपनीचे पाच कामगार सीसीटीव्ही बसवण्याचे आणि लोखंडी बॅरेलच्या दुरुस्तीचे काम करत होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास हे कामगार जेवण करण्यासाठी थांबले. कडक उन्हामुळे त्यांनी जवळच उभ्या असलेल्या कंपनीच्या सर्विस ट्रक आणि जेसीबीच्यामध्ये असलेल्या सावलीचा आधार घेतला. सुरक्षेचा नियम पाळत त्यांनी आजूबाजूला सेफ्टी बॅरिकेट्सही लावले होते, मात्र नशिबाने घात केला. हे पाचही जण जेवणाचे डबे उघडून बसलेले असतानाच, जालन्याकडून नागपूरच्या दिशेने लोखंडी सळ्या वाहून नेणाऱ्या एका ट्रकने उभ्या असलेल्या ट्रकला पाठीमागून जोरदार धडक दिली.
Maharashtra Budget 2026 : महाराष्ट्राच्या संपूर्ण अर्थसंकल्पाची A टू Z माहिती, शेतकरी कर्जमाफी ते मुंबई-पुण्यासाठी काय-काय घोषणा?
धडक इतकी प्रचंड होती की, उभा असलेला ट्रक थेट खाली बसलेल्या कामगारांच्या अंगावर चढला आणि त्यांना चिरडत समोरच्या जेसीबीवर जाऊन आदळला. अपघातग्रस्त ट्रकने या दोन्ही वाहनांना आणि खाली दबलेल्या मजुरांना काही अंतरापर्यंत फरपटत नेले. या भीषण घर्षणामुळे तिघांचा जागीच अंत झाला.
Uddhav Thackeray : ‘विकासाचं मृगजळ दाखवणारा, कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प’, उद्धव ठाकरेंची अर्थसंकल्पावर टीका
जेवणाचे डबे रक्ताने माखले
काही क्षणांपूर्वी एकमेकांशी गप्पा मारत जेवण करणाऱ्या या कामगारांचे जेवणाचे डबे रक्ताने माखले होते. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले. गंभीर जखमी असलेल्या दोन कामगारांना तात्काळ घाटी रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. समृद्धी महामार्गावर वाहनांचा वेग आणि चालकांचा निष्काळजीपणा निष्पाप जीवांच्या जीवावर उठत आहे. सीसीटीव्ही लावून हा मार्ग हायटेक आणि सुरक्षित करणाऱ्या कामगारांचाच अशा प्रकारे बळी गेल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
