• Sat. Sep 21st, 2024

‘शिंदे साहेबांमुळं तुम्ही पालकमंत्री’ शिवसैनिक अतुल सावेंवर चिडले, जालन्यात जोरदार राडा

‘शिंदे साहेबांमुळं तुम्ही पालकमंत्री’ शिवसैनिक अतुल सावेंवर चिडले, जालन्यात जोरदार राडा

जालना : जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीआधीच जिल्हाधिकारी कार्यालयात राडा झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या शिवसैनिकांनी पालकमंत्र्यांविरोधात घोषणाबाजी केली. पालकमंत्री अतुल सावे यांना अडवून शिवसैनिकांनी त्यांच्या समोर घोषणाबाजी केली. शिवसैनिकांनी यावेळी एकनाथ शिंदे यांच्यामुळं तुम्ही पालकमंत्री झाल्याचं अतलु सावे यांना सांगितलं. पालकमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाल्याचं पाहायला मिळालं. कामे मंजूर होत नसल्याने आणि नियोजन समितीतील कामावरून बाचाबाची झाली. भाजप सत्तेत कुणामुळे, शिवसेनेमुळे शिवसेनेमुळे अशी घोषणाबाजी शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे,पंडित भुतेकर यांनी केली. यानंतर घोषणाबाजी करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. तर, पालकमंत्री म्हणून अतुल सावे यांनी सभ्यतेची भाषा ओलांडली म्हणून हा प्रकार घडल्याचं सेना नेते अर्जुन खोतकर यांनी म्हटलं. तर, एका शिवसैनिकांनं आमच्या शिंदेसाहेबांमुळं पालकमंत्री झालात हे लक्षात ठेवा, असं म्हटलं.

जालन्यात आज जिल्हा नियोजन समितीची बैठक होती.या बैठकीला आलेल्या पालकमंत्री अतुल सावे यांना शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाण्या आधी अडवून धरलं. यावेळी अतुल सावे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.जिल्हा नियोजन समितीतून कामे मंजूर होत नाहीत,आम्हाला डावललं जात असा आरोप शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे आणि पंडित भुतेकर यांनी केला.यावेळी संतप्त कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी भाजप केवळ शिवसेनेमुळे सत्तेत आहे अशा घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला होता.याच घोषणाबाजीत पालकमंत्री अतुल सवे आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली.

हा गोंधळ चालू असताना पोलिसांनी त्यात हस्तक्षेप करत घोषणाबाजी करून गोंधळ घालणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशन मध्ये आणल्यावर तिथे शिंदे गटाचे उपनेते अर्जुन खोतकर यांनी धाव घेतली आणि घडलेल्या प्रकरणाची माहिती घेतली.शिवसेना पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासमोर झाला प्रकार सांगत पालकमंत्री हे कामात दूजाभाव करत असल्याचे सांगितले.

मतदारसंघामध्ये निधी मिळेना, अंबादास दानवे अन् संदीपान भुमरेंमध्ये वाद

संकटामागून संकटं, करायचं काय?, कपाशी पडली लाल, शेतकऱ्याने ४ एकरातील कपाशीवर फिरविला ट्रॅक्टर, लाखोंचं नुकसान

अर्जुन खोतकर काय म्हणाले?

अर्जुन खोतकर यांनी यानंतर बोलताना जी सभ्यतेची भाषा असते मंत्री म्हणून ती पालकमंत्र्यांनी ओलांडली, त्यामुळे शिवसेनेकडून जालना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीआधी हा प्रकार घडला, असे खोतकर म्हणाले.पालकमंत्री सतत अपमान करत असल्याची आमच्या कार्यकर्त्यांची तक्रार आहे. पालकमंत्री अतुल सावे हे कामात दुजाभाव करतात हे सत्य आहे मात्र मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आम्हाला न्याय देतील अशी आम्हाला अपेक्षा असल्याचं अर्जुन खोतकर यांनी जालन्यातील राड्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे.
Uddhav Thackeray: महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी, उद्धव ठाकरे राज ठाकरेंसोबत चर्चा करण्यास तयार, कारण समोर…

अतुल सावे काय म्हणाले?

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या नेत्यांना कामे मागितली पाहिजेत. त्यांना मी कामे दिली,त्यांना मिळाली नसतील तर त्यात माझा काय दोष, असा सवाल अतुल सावे यांनी केला. शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नाराजीला मी जबाबदार नाही. राष्ट्रवादी सत्तेत आल्यानं वाटेकरी वाढले आहेत अशी प्रतिक्रिया जिल्हा नियोजन समिती सदस्य निवडीवर आणि आज झालेल्या राड्यावर अतुल सावे यांनी दिली.

नाराजी वाढली! ४५ हजार कोटींची विकासकामे राज्याबाहेरच्या कंपन्याकडे, किरकोळ कामे स्थानिकांकडे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed