संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा कार्यकर्ता मेळावा मुंबईत पार पडला. या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं. विकासच हवा असेल तर ब्रिटीशही विकास करत होते. मुंबईतील अनेक वास्तू त्यांनी बांधल्या आहेत. त्यातील काँग्रेसच्या सत्तेची ७० वर्षे काढा. गेल्या १० वर्षांत तुम्ही काय केले ते सांगा. आम्हाला विकास हवा. मात्र, स्वातंत्र्यासोबत विकास हवा आहे, असे सांगताना आरपारच्या लढाईचा एल्गारच उद्धव ठाकरे यांनी पुकारला.
हिम्मत असेल तर मणिपूरच्या पीडितेकडून आणि बिल्किस बानोकडून राखी बांधून घ्या
मुस्लिम भगिनींकडून रक्षाबंधन करून घ्या, अशा सूचना पंतप्रधानांनी एनडीएतील खासदारांना दिल्या आहेत. त्याचवेळी मणिपूरमध्ये अत्याचार होणाऱ्या महिलांच्या संरक्षणाचे काय? असा सवाल विचारताना हिम्मत असेल तर गुजरातमध्ये अत्याचार झालेल्या बिल्कीस बानोकडून त्यांनी रक्षाबंधन करून घ्यावे. जिच्या गुन्हेगारांना त्यांनी मोकाट सोडले आहे, असा जहरी वार उद्धव ठाकरेंनी केला.
स्वातंत्र्याची लढाई लढायची आहे
भगव्याला विरोध करणाऱ्या राजकीय औरंगजेब आणि राजकीय अफजलखानाच्या छाताडावर आपल्याला भगवा फडकावायचा आहे. आपल्याला कोणत्याही व्यक्तीला संपवायचे नाही. आपल्याला देशविरोधी विचार संपवायाचे आहेत. महाराष्ट्रातील छत्रपती शिवराय यांच्यासारख्या तेजाची प्रेरणा घेत आपल्याला ही स्वातंत्र्याची लढाई करायची आहे. त्यात आपण निक्कीच विजयी होऊ, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.
आंब्याच्या पेटीत एकजरी सडका आंबा जरी असेल तरी तो संपूर्ण पेटी नासवतो
“आंब्याच्या पेटीत एकजरी सडका आंबा जरी असेल तरी तो संपूर्ण पेटी नासवतो. त्यामुळे आपण सडके आंबे लांब केले. आपल्याला मुख्यमंत्रीपदाची इच्छा नव्हती. आपल्याला शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवायचा आहे. त्यासाठी आपल्या स्वाभिमानाची आणि स्वातंत्र्यासाठीची ही लढाई आहे. त्यांच्या सत्तेला १० वर्षे होत आली. आता होऊन जाऊ दे चर्चा. त्यांनी काय केले याची चर्चा करा. त्यांचा भ्रमाचा भोपळा आहे. तो फोडण्याची वेळ आली आहे. त्यांचे चल रे भोपळ्या टुणुक टुणुक सुरू आहे. त्यांनी किती योजना सुरू केल्या, किती योजना जनतेपर्यंत पोहोचल्या. याची चर्चा करा”
संभाजी भिडेंवर कारवाई का करत नाही?
असा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, शाहू, फुले आंबेडकर यांचा महाराष्ट्र असू शकत नाही. एक गुरुजी या महापपरुषांचा अपमान करत आहे. हे त्यांचेही गुरुजी आहे. अशा व्यक्तींवर कारवाई का करत नाही? छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला गेले तेव्हा त्यांच्या नजरेत तेज होते. बादशहाही त्यांच्या नजरेला नजर मिळवू शकत नव्हता. छत्रपती संभाजी महाराजांचे बलिदान अवर्णनीय आहे. आता जनतेला कौल दिला नाही. तर आमदार विकत घेत सरकार स्थापन करत आहेत!
विकासच हवा असेल तर ब्रिटीशही विकास करत होते…!
देशातील सर्व नागरिक म्हणजे भारत माता आहे. या भारतमातेचे स्वांतत्र्य टिकवण्याची शपथ आपल्याला घ्यायची आहे. विकासच हवा असेल तर ब्रिटीशही विकास करत होते. मुंबईतील अनेक वास्तू त्यांनी बांधल्या आहेत. त्यातील काँग्रेसचे सत्तेची वर्षे काढा. गेल्या 10 वर्षांत तुम्ही काय केले ते सांगा. आम्हाला विकास हवा. मात्र, स्वातंत्र्यासोबत विकास हवा आहे!