• Sat. Sep 21st, 2024

मित्रांसोबत बॅडमिंटन खेळून घरी जात होता, वाटेत दुचाकी घसरली अन्… आई-वडिलांचा आधार गेला

मित्रांसोबत बॅडमिंटन खेळून घरी जात होता, वाटेत दुचाकी घसरली अन्… आई-वडिलांचा आधार गेला

पुणे: मित्रांसोबत बॅडमिंटन खेळून रात्री दुचाकीवरून घरी चाललेल्या आयटीतील तरुणाचा कात्रज-कोंढवा रस्त्यावर अपघातात जागीच मृत्यू झाला. शनिवारी रात्री ही घटना घडली असून आदित्य लाहोटी (वय ३०) असे त्यात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. दुचाकी घसरल्याने आदित्य रस्त्यावर पडला. त्यावेळी मागून येणारा मोठा ट्रेलर त्याच्या अंगावरून गेल्याने गंभीर जखमी होऊन आदित्यचा मृत्यू झाला.

आदित्य कोंढवा बुद्रुक येथील टिळेकरनगरमधील आकृती कंट्रीवुड्स या सोसायटीत राहत होता. तो एका खासगी आयटी कंपनीत कामाला होता. त्याच्या पश्चात वडील, आई आणि दोन बहिणी असा परिवार आहे. आदित्यच्या निधनामुळे लाहोटी कुटुंबासह त्याच्या सोसायटीवर शोककळा पसरली. ‘शनिवारी-रविवारी सुटी असल्याने आदित्य नियमितपणे बॅडमिंटन खेळण्यासाठी जात होता. रविवारीदेखील तो खेळण्यासाठी गेला होता. तिथून घरी परत येत असताना कात्रज-कोंढवा रस्त्यावर गोकुळनगरजवळील पॅरामाउंट सोसायटीसमोर त्याचा अपघात झाला,’ असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले.

विरोधात जाऊन लव्ह मॅरेज, पण तीनच वर्षात सारं काही धुळीस मिळालं; आई-वडिलांची लाडकी लेक गेली
रस्त्याची दुर्दशा; खड्ड्यांमुळे धोकादायक

कात्रज-कोंढवा रस्त्याची गेल्या काही वर्षांपासून दुर्दशा झालेली आहे. त्यातच आता पावसामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. त्यामुळे रस्त्यावर धोकादायक चित्र पाहायला मिळते आहे. दुचाकीस्वारांना येथून जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो.

महिलेला समुद्रकिनारी भयंकर दिसलं, लोक म्हणाले राक्षस, VIDEO पाहून झोप उडेल
रस्त्याच्या दुर्दशेबाबत नागरिक आक्रमक

‘या रस्त्यावर आतापर्यंत असंख्य मृत्यू झाले आहेत आणि दुर्दैवाने त्याची झळ अनेकांना बसली आहे. वयाच्या तिसाव्या वर्षीच आदित्यवर काळाने घाला घातला. प्रशासन व्यवस्था आता परस्परांवर आरोप करील. मात्र, आदित्य परत येऊ शकणार नाही. हा रस्ता सुरक्षित होण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र काम करणे, हीच आदित्यला खरी श्रद्धांजली असेल,’ अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. ‘टिळेकर नगर सजग नागरी मंचा’च्या माध्यमातून कात्रज-कोंढवा रस्त्याच्या सुरक्षेबाबत प्रशासनाशी संवाद साधण्यासाठी कृती कार्यक्रम ठरविण्यात येणार असल्याचेही येथील नागरिकांनी सांगितले.

काॅन्स्टेबलकडून ३ प्रवासी अन् एका पोलीसावर गोळीबार; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये थरकाप उडवणारी घटना

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed