• Sat. Sep 21st, 2024
भररस्त्यात वीस फूट खोल खड्डा; नागरिकांच्या जीवाशी खेळ, शिवसेना आक्रमक, भाजपवर केला आरोप

धुळे: शहरातील केंद्रीय विद्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर चक्क २० फुट खोल तलाव ठेकेदाराने करण्याचा चमत्कार घडविला आहे. त्याच्या या चमत्कारामुळे विद्यार्थी आणि रहिवाशाचा जीव धोक्यात आला आहे. गुजरातचा हा ठेकेदार भारतीय जनता पक्षाचा जावई आहे का? असा सवाल धुळ्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने उपस्थित केला आहे.
विद्यार्थी दशेतच निवडणुका; शाळेचा अभिनव उपक्रम, कोल्हापुरातील प्रशाला चर्चेत
केंद्रीय विद्यालयाकडे जाणाऱ्या ओसवाल नगर भागातील देवपूरात असलेल्या प्रमुख रस्ता मागील सुमारे चार महिन्यांपासून भूमिगत गटार योजनेच्या नावाने खोदून ठेवलेला आहे. ओसवाल नगर भागात पाण्याचा निचरा होण्यासाठी नैसर्गिक छोटे नाले आहेत. या प्रमुख बाबीकडे दुर्लक्ष करून भूमिगत गटार योजनेत कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करण्याच्या हेतूने, उंच अथवा डोंगराच्या भागाकडे म्हणजेच उलट्या दिशेने खडक फोडण्याच्या नावाने मागील चार महिन्यांपासून सुमारे वीस फुटापेक्षा जास्त खोल, सुमारे ५० फूट लांबीचा तसेच पंधरा फूट रुंदीचा मुख्य रस्त्यात मोठा खड्डा खोदून ठेवलेला आहे.

सर्वसाधारण खड्डा खोदण्यासाठी येणारा खर्चापेक्षा सुमारे सहा ते सात पटीने जास्त पैसे खडक फोडण्याच्या नावाने घेता येतात. तसेच फुगीर मेजरमेंट दाखवून कोट्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करता येतो. याच एकमेव गैर हेतूने नागरिकांना त्रास होत असताना देखील सदर बेकायदेशीर आणि नियमबाह्य काम रेटून नेण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे केंद्रीय विद्यालयाकडे जाणारा मुख्य रस्ता मागील तीन-चार महिन्यांपासून बंद आहे. याबाबत नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी केल्यानंतर देखील या तक्रारींकडे ठेकेदार आणि प्रशासनाकडून कोणतीही दाखल घेण्यात आलेली नाही. याबाबत स्थानिक नागरिकांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे तक्रारी दिल्यानंतर सुमारे आठ दिवसांपूर्वी शिवसेना विधानसभा संघटक ललित माळी यांनी सदरचे काम त्वरित पूर्ण करण्यासंदर्भात प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळविले होते.

आई वडिलांना सांभाळणाऱ्या मुलांनाच मिळणार वारसा हक्क, नवलेवाडी ग्रामपंचायतीचा आदर्श ठराव

तसेच सदर काम त्वरित पूर्ण न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिलेला होता. परंतु त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले असल्याचे चित्र सध्या बघायला मिळत आहे. सदर कृत्रिम खड्ड्यांमध्ये शाळकरी विद्यार्थी किंवा जेष्ठ नागरिक पडून मृत्यू होण्याची दाट शक्यता आहे. तसेच या खड्ड्यांमध्ये असलेल्या पाण्यामुळे परिसरामध्ये इतर आजार पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे धुळे मनपाने त्वरित हा खड्डा बुजवून सदर घटना टाळाव्यात. अन्यथा येणाऱ्या काळात धुळे मनपाला टाळे ठोकल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही, असा इशारा यावेळी शिवसेनेच्या वतीने देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed