• Sun. Mar 15th, 2026
    ट्रेनमध्ये गोळीबाराचा आवाज, दहशतवादी हल्ल्याच्या भीतीने प्रवाशांची पळापळ,३० मिनिटांत काय घडलं?

    मुंबई: रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) एका जवानाने सोमवारी जयपूर-मुंबई एक्सप्रेस ट्रेनमध्ये केलेल्या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सहायक पोलीस निरीक्षकाचाही समावेश आहे. पहाटे साडेपाचच्या सुमारास ट्रेन पालघर आणि विरार या स्थानकांदरम्यान असताना हा प्रकार घडला. एक्सप्रेस ट्रेनच्या बोगी क्रमांक बी-५ मध्ये आरपीएफ कॉन्स्टेबल चेतन सिंह याने रिव्हॉल्वरमधून या सगळ्यांवर गोळ्या झाडल्या. त्यानंतर चेतन सिंह याने साखळी खेचून ट्रेन थांबवली आणि पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, भाईंदर रेल्वे पोलिसांच्या पथकाने चेतन सिंह याला रिव्हॉल्व्हरसह ताब्यात घेतले.

    पहाटेच्या वेळी चालत्या ट्रेनमध्ये गोळीबाराचा आवाज ऐकून अनेक प्रवासी दचकून उठले. प्रवाशांना केवळ गोळ्या झाडण्याचा आवाज आला मात्र, नेमके काय झाले हे समजत नव्हते. त्यामुळे बी-५ बोगीमधील प्रवासी प्रचंड घाबरले होते. काही प्रवाशी हे सामान सोडून घाबरुन सैरावरा पळत सुटले. या डब्यात लहान मुलेही होती. गोळीबारापासून त्यांना वाचवण्यासाठी पालक मुलांना लपवण्याचा प्रयत्न करु लागले. तर अनेकांनी सामान घेऊन पळ काढला. एका प्रवाशाने सांगितले की, जेव्हा गोळीबार झाला तेव्हा तो झोपला होता. ते गोळीबाराच्या आवाजाने खडबडून जागे झाले. त्यांना जागा आल्यानंतर प्रथम वाटले की, ट्रेनचा अपघात झाला आहे. मात्र, थोड्यावेळाने समोर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह दिसले. त्यामुळे मी घाबरून सीटच्या बाजूला लपून बसलो. तर काही प्रवाशांना गोळीबाराचा आवाज ऐकून दहशतवादी हल्ला झाल्याचे वाटले. समोर प्रवाशांचे मृतदेह पडलेले दिसताच प्रवाशांचा थरकाप उडाला. त्याचवेळी चेतन सिंह डब्यात रिव्हॉल्व्हर हातात घेऊन फिरत होता. त्याला बघून प्रवाशी बोगीच्या दुसऱ्या टोकाला जाऊन लपले.

    लहान मुलाला घेऊन ट्रेनमधून उडी मारली

    गोळीबाराचा आवाज ऐकून बी-५ बोगीतील सर्वच प्रवाशी प्रचंड घाबरले होते. अनेकांना काय झाले हे कळत नव्हते. त्यामुळे जयपूर-मुंबई एक्सप्रेसचा वेग कमी झाल्यानंतर काही प्रवाशांनी लहान मुलांना घेऊन ट्रेनमधून उड्या मारल्या. त्यामुळे काही प्रवाशांना दुखापतही झाली आहे. चेतन सिंह याने प्रवाशांना पाहून त्यांच्या दिशेनेही गोळ्या झाडल्याचे समजते.

    मृतदेह खाली पडले होते, तो पोलीस रिव्हॉल्व्हर घेऊन बोगीत फिरत होता; जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये नेमकं काय घडलं?

    गोळीबाराचे नेमके कारण काय?

    रेल्वे पोलिसांनी हल्लेखोर चेतन सिंहला ताब्यात घेऊन चौकशी सुरु केली आहे. या चौकशीतून समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार, चेतन सिंह हा त्याची बदली झाल्यामुळे प्रचंड रागात होता. त्याची मनस्थिती बिघडली होती. चेतन सिंह गुजरातमध्ये कार्यरत होता, त्याची मुंबईला पोस्टिंग करण्यात आली होती. याच रागातून वाद होऊन चेतन सिंह याने ASI टिका राम मीना यांच्यावर गोळी झाडली असावी, असे सांगितले जात आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed