• Sat. Sep 21st, 2024
Jaipur Mumbai Train Firing: पालघरजवळ एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गोळीबार, पोलिसासह ४ जणांचा मृत्यू

मुंबई: जयपूर-मुंबई एक्स्प्रेस ट्रेनमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. पालघरनजीक चालत्या ट्रेनमध्ये ही गोळीबाराची घटना घडली. यामध्ये चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्याचा समावेश असल्याचे कळते. त्यामुळे हे प्रकरण नेमके काय आहे, याबद्दलची उत्कंठा वाढली आहे. हा गोळीबार नेमका कोणत्या कारणामुळे झाला, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. प्राथमिक माहितीनुसार, जयपूर-मुंबई एक्स्प्रेस पालघर स्थानकाजवळून जात असताना हा प्रकार घडला. एक्स्प्रेस ट्रेनच्या बी-५ या बोगीमध्ये हा प्रकार घडला त्यानंतर ही एक्सप्रेस ट्रेन मीरारोड स्थानकात थांबवून मृत्यमुखी पडलेल्या चारही व्यक्तींचे मृतदेह शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले आहेत. याठिकाणी या मृतदेहांचे शवविच्छेदन आणि पुढील सोपस्कार पार पडतील. मात्र, हा गोळीबार नेमका कशामुळे झाला, याचा शोध पोलिसांकडून सुरु झाला आहे.

जयपूर-मुंबई एक्स्प्रेस काहीवेळापूर्वीच मुंबई सेंट्रल स्थानकात दाखल झाली. त्यानंतर लोहमार्ग पोलीस आणि इतर यंत्रणांना तातडीने एक्स्प्रेस ट्रेनचा ताबा घेतला आहे. पोलिसांकडून सध्या पुढील तपासाला सुरुवात झाली आहे. या तपासातून काय निष्पन्न होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. चोरीच्या प्रयत्नातून ही घटना घडली, असावी असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, नेमके कारण अद्याप कळू शकलेले नाही.

जयपूर रेल्वे स्टेशनवरून रविवारी दुपारी दोन वाजता सुटलेली जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेस आज पहाटे ६:५५ वाजता मुंबई सेंट्रल स्टेशनवर पोहोचणार होती. ट्रेनला जयपूर आणि मुंबई दरम्यानचे ११६० किमी अंतर कापण्यासाठी १६ तास ५५ मिनिटांचा कालावधी लागतो. ही एक सुपरफास्ट ट्रेन आहे.

नेमकं काय घडलं?

जयपूर-मुंबई एक्सप्रेस ट्रेनच्या बोगी क्रमांक बी-५ मध्य हा प्रकार घडला. रेल्वे पोलीस दलातील कॉन्स्टेबल चेतन सिंह यांनी चालत्या ट्रेनमध्ये आपल्या सहकाऱ्यांवर गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती आहे. यावेळी आजुबाजूला चार सहप्रवाशीही होते. या प्रवाशांचा गोळीबारात मृत्यू झाल्याचे समजते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed