आजपर्यंत आपण सोनं,गाडी,पैसा अशा गोष्टी चोरी झाल्याचे ऐकले असेल. पण चोरटे टोमॅटो ही चोरी करतील असा कोणी विचार केला नव्हता. टोमॅटो आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्याने चोरांनी चक्क टोमॅटो चोरीलाही सुरुवात केली आहे. असाच एक प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथील शेतकरी अशोक मस्के यांच्या शेतातली तब्बल २० गुंठ्यातील २५ कॅरेट टोमॅटो चोरुन नेले आहे. म्हस्के हे दरवर्षी भाजीपाल्याची शेती करतात. यंदा २५ गुंठ्यामध्ये त्यांनी टोमॅटोची लागवड केली. ते मागच्या दोन दिवसांपूर्वी शेतात येत पिकाची पाहणी करून टोमॅटो तोडण्याच्या नियोजनात होते. परंतु शेतात आल्यानंतर टोमॅटोच नसल्याने त्यांना धक्का बसला. यामुळे शेतकऱ्याला तब्बल ५० हजार रुपयाचे नुकसान झाले आहे. अशोक मस्के यांच्या शेतात टोमॅटोचे पीक घेण्यात आले होते. अंधार आणि पावसाचा फायदा घेत तसेच सीसीटीव्हीला चकवा देत चोरट्यांनी टोमॅटोची चोरी केल्याने शेतकरी हवालदिल झाला असून या प्रकरणी आता पोलीस तपास हा सुरु करत आहे.
जिल्ह्यात १५ दिवसात दुसरी घटना
दरम्यान मागच्या काही दिवसांपूर्वीच एका समाजकंटकाने शेतकऱ्याच्या शेतातील टॉमेटो उपटून टाकल्याने दहा ते बारा लाखाचे नुकसान केले होते. कोल्हापुरातील सांगवडेवाडी येथील माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना घडली होती. यानंतर १५ दिवसातच ही दुसरी घटना घडली असल्याने टोमॅटोसाठी आता पोलीस बंदोबस्त घ्यावा लागेल की काय, अशी परिस्थिती निर्माण होत आहे.
मुंबईत टोमॅटोला सोन्याचा भाव
नवी मुंबई येथील एपीएमसी बाजारपेठेत टोमॅटोची आवक फार कमी झाली आहे. त्यामुळे साहजिकच मुंबईतील किरकोळ बाजारपेठांमध्ये टोमॅटोचे दर कडाडले आहेत. चार दिवसांपूर्वी मुंबईतील किरकोळ बाजारपेठेत टोमॅटोच्या दरांनी २०० रुपये प्रतिकिलो इतका भाव गाठला आहे. त्यामुळे ग्राहक टोमॅटोकडे पाठ फिरवत आहेत. टोमॅटो खरेदी करणाऱ्यांची संख्या कमी झाल्याने काही भागांमध्ये भाजीविक्रेत्यांनी टोमॅटो विकणे बंद केले आहे. मे महिन्यात नियमित ३० रुपये किलो दराने विकला जाणारा टोमॅटोचा भाव १३ जूनला दुप्पट होऊन ५०-६० रुपये झाला. त्यानंतर टोमॅटोने २७ जूनला १०० रुपयांचा टप्पा पार केला आणि ३ जुलैला १६० रूपयांचा नवा विक्रम केला होता. त्यानंतर आता टोमॅटोचा दर प्रतिकिलो २०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे.