एका १७ वर्षीय मुलाचा विद्युत झटका लागून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास कळवा पूर्वेतील न्यू शिवाजी नगर परिसरात घडली आहे. मंदार महेंद्र गौरी असे १७ वर्षीय मुलाचं नाव असून महापालिकेच्या स्ट्रीट पोलला लागून असलेल्या केबलचा शॉक लागून जागीच त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात येत आहे. गुरुवारी मुंबई ठाणेसह कळव्यात देखील मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यात कळव्यातील न्यू शिवाजी नगर परिसर हा जलमय झाला होता. रस्त्यावर साचलेले पाणी बघून मंदार हा फुटपाथ वरून गेला असता त्याला विजेचा झटका बसून तो अचानक खाली कोसळला.
मंदार हा विजेच्या झटक्याने तडफडत असताना नागरिकांनी पहिले मात्र कोणीतरी मद्यपान करून पडला असेल म्हणून त्याच्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष केल.. मात्र बराच वेळाने तडफडत असलेला तरुण हा आपल्याच विभागातील मुलगा मंदार असल्याचं स्थानिकांच्या निदर्शनास आल. त्यानंतर स्थानिकांनी मंदारला तात्काळ उपचारासाठी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात एकच शोककळा पसरली होती.
दरम्यान स्थानिकांनी त्याच्या मृत्यूबाबत विद्युत पोलच्या देखभालीकडे दुर्लक्ष केल्याबद्दल महापालिकेला जबाबदार धरल आहे. तर रस्त्यावरील विद्युत पोल वरून तार टाकून विजेची चोरी केलेल्या वायरीचा शॉक लागून या तरुणाचा मृत्यू झाला आहे, असा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. आता या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून तपासाअंती त्याचा मृत्यू कसा झाला आणि या प्रकरणात नक्की जबाबदार कोण? हे स्पष्ट होणार आहे. मात्र या घटनेत पालिका प्रशासन आणि नागरिकांचे दुर्लक्ष यामुळे एका निष्पाप कोवळ्या मुलाचा हकनाक बळी गेला हेही तितकेच खरे.
