याप्रकरणी सुदेश रणछोडदास वैष्णव (५०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांचा रिअर इस्टेटसह ब्रोकरसह सौंदर्य प्रसाधने, गिफ्ट शॉपीचा व्यवसाय आहे. कामानिमित्त फिर्यादीचे पुणे, मुंबईला येणे जाणे होत असल्याने आवश्यकेनुसार आरोपी ऋषिकेशचे वडील चालक म्हणून जात असत. दरम्यान ऋषिकेशचे वडील आजारी असल्याने एक दोन वेळेस तो चालक म्हणून गेला होता. दरम्यान आरोपीच्या वडिलांनी आपल्या मुलाला कामाला घेण्याची विनंती केली असता फिर्यादीलाही कामासाठी गरज असल्याने त्यांनी ऋषिकेशला कामाला घेतले. काही दिवसांतच त्याने मालकाचा विश्वास संपादन करत पदमपुऱ्यातील ऑफिसच्या जागेचा संपूर्णपणे विनियोग होत नसल्याने उर्वरित जागेत सेतू सुविधा सुरू करण्याचा मनोदय बोलून दाखविला.
ही संकल्पना फिर्यादीला पटल्याने त्यांनी तेही काम सुरु केले. दरम्यान कार्यालयाची पूर्ण जबाबदारी आरोपी सांभाळत असे. यासाठी फिर्यादीने त्याला युपीआय पासवर्डसह, बॅंकेचे एटीएमसह सर्व तपशील दिलेला होता. त्यातून तो सर्व व्यवहार करत असे. २०२१ मध्ये आरोपीचे वडील रतन करपेंनी फिर्यादीकडून काही पैसे उसनवारीवर घेत काल्डा कॉर्नर येथे हरिओम ओटीसी ट्रान्सपोर्ट हा कुरिअर व्यवसाय सुरु केला. मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांचे निधन झाले. त्यानंतर आरोपीने ते बंद करुन ऋषिकेश एआरआय कार्गो ही कुरिअर सर्विस सुरू केली. दरम्यान कोरोना काळात फिर्यादीचा व्यवसाय कोलमडून पडला. मात्र बचतीच्या पैशांतून त्यांनी स्वतःची आर्थिक घडी बसविली.
दरम्यानच्या काळात आरोपीने वैष्णव यांच्याकडून लग्नासाठी आठ लाख रुपये घेतले. आरोपीला त्याच्या लग्नाला दिलेले पैसे अन् वडीलांचे झालेले निधन या घटना विचारात घेऊन फिर्यादीने आज, उद्या पैसे देईलच हा विश्वास दाखवत २०२१ मध्येच स्वतःचा एक फ्लॅट ४० लाखांत विक्री करत ते पैसे खात्यात टाकले. याचा आरोपी हा त्यावेळेस साक्षीदार होता. त्याच खात्यात अगोदरचे १० लाख रुपये असल्याचे आणि आता ४० लाख जमा झाल्याचे त्याला माहिती होते. विशेष म्हणजे फिर्यादीने ही रक्कम मार्च २०२३ मध्ये १२ वी नंतर मुलाच्या शिक्षणासाठी ठेवल्याचे सांगत यातला एकही रुपया काढू नको, असे म्हटले होते. दरम्यान आरोपीने फिर्यादीकडून दोन लाख रुपयांत त्याची ही कार विकत घेत स्वतःच्या नावावर करुन घेतली.
मात्र तेही पैसे दिले नाहीत. मालकाला बॅंकेत २५ लाख रुपये कमी दिसल्याने त्यांनी स्टेटमेंट पाहिले असता आरोपीने स्वतःच्या ट्रान्सपोर्टसाठी वाहनांत पेट्रोल, डिझेलसाठी वापरल्याचे समोर आले. त्याचा शोध घेतला असता तोही फरार झाल्याचे उघड झाले. एप्रिल २०२३ पासून तो बेपत्ता असून त्याच्या कुटूंबियांनीही आपला त्याच्याशी संपर्क नसल्याचे फिर्यादीला सांगितले. विशेष म्हणजे इतक्या दिवसांपासून संपर्क नसल्याचे कुटूंबिय सांगत असले तरी त्यांनी साधी पोलिसात मिसींगची नोंदही केली नाही हे विशेष. याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास निरीक्षक ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक मनिषा हिवराळे करत आहेत.