पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राष्ट्रवादीमध्ये बंड करत शिंदे-फडणवीसांची साथ देत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर आता अजित पवार आता महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चांना पेव फुटलं आहे. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि आमदार अमोल मिटकरी यांनी अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ट्विट करत अजित पवार लवकरच मुख्यमंत्री होणार असल्याचं म्हटलं आणि या चर्चांना अधिकच हवा मिळाली. या चर्चांवर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
‘राज्याच्या सत्तेत आम्ही ज्यावेळेला सहभागी झालो त्याच वेळी या गोष्टीची स्पष्टता आली आहे. आता आम्ही महायुतीत एनडीएचे घटक आहोत. दादा मुख्यमंत्री व्हावेत, अशी राज्याच्या जनतेची आणि कार्यकर्त्यांची इच्छा-अपेक्षा जरूर आहे पण आघाडीच्या राजकारणातील अपरिहार्यता लक्षात घेता भविष्यात आम्ही एनडीएच्या माध्यमातून काम करण्याचं निश्चित केलं आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्रिपदाचा प्रश्नच उद्भवत नाही, असं सांगताना सुनील तटकरे यांनी दादांच्या मुख्यमंत्रिपदाचा विषय क्लिअर केला आहे.
‘राज्याच्या सत्तेत आम्ही ज्यावेळेला सहभागी झालो त्याच वेळी या गोष्टीची स्पष्टता आली आहे. आता आम्ही महायुतीत एनडीएचे घटक आहोत. दादा मुख्यमंत्री व्हावेत, अशी राज्याच्या जनतेची आणि कार्यकर्त्यांची इच्छा-अपेक्षा जरूर आहे पण आघाडीच्या राजकारणातील अपरिहार्यता लक्षात घेता भविष्यात आम्ही एनडीएच्या माध्यमातून काम करण्याचं निश्चित केलं आहे. त्यामुळे आज मुख्यमंत्रिपदाचा प्रश्नच उद्भवत नाही, असं सांगताना सुनील तटकरे यांनी दादांच्या मुख्यमंत्रिपदाचा विषय क्लिअर केला आहे.
दरम्यान, अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख होत असताना त्यावर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील म्हणाले की, “ते त्यांचं मत आहे. एकनाथ शिंदे सध्या मुख्यमंत्री आहेत. अजित पवार मुख्यमंत्री हे कोणत्या गणितात, कसे होऊ शकतात, ते कळल्याशिवाय बोलणं योग्य होणार नाही”
तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थ खात्याची सूत्रे हाती आल्यानंतर आठवडाभरातच राष्ट्रवादीच्या बंडखोर आमदारांवर निधीचा वर्षाव केला आहे. त्यांनी या आमदारांच्या मतदारसंघातील विकासकामांसाठी २५ कोटींहून अधिक निधी मंजूर केला. यावर शिवसेनेचे आमदार नाराज असल्याची चर्चा सुरु असताना या चर्चांचं खंडन करत कोणताही आमदार नाराज नसल्याचं तटकरेंनी स्पष्टीकरण दिलं आहे.