पालघर जिल्ह्यात चार-पाच दिवसांपासून पाऊस सुरु आहे. जिल्ह्यात मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातलं आहे. मुसळधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी देखील साचले असून यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. वसई पश्चिमेकडील गिरीज येथील सातोडीवाडी परिसरात देखील मुसळधार पावसामुळे पाणी साचले होते.
या परिसरातीलच रहिवासी ब्रायन कार्व्हालो गुरुवारी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास बिस्कीट आणण्यासाठी आपल्या घराबाहेर पडले होते. मुसळधार पावसातच घरासमोर असलेल्या नाला ओलांडताना त्यांचा तोल गेल्याने अचानक ते नाल्यात पडले आणि पाण्याच्या प्रवाहात नाल्यात वाहून गेले. ब्रायन कार्व्हालो घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी यांचा सर्वत्र शोध सुरु केला. काही वेळाने ब्रायन कार्व्हालो नाल्यात पडलेले कुटुंबीयांना त्यांच्या आढळून आले.
कुटुंबीयांनी ब्रायन कार्व्हालो यांना तात्काळ उपचारासाठी वसई बंगली परिसरातील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान ब्रायन कार्व्हालो यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या संपूर्ण प्रकरणी वसई पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेनं परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.