• Sat. Sep 21st, 2024

इर्शाळवाडी दरड दुर्घटना कुठल्या कारणांमुळे घडली? भविष्यातही अशी शक्यता, तज्ज्ञांमध्ये चर्चा

इर्शाळवाडी दरड दुर्घटना कुठल्या कारणांमुळे घडली? भविष्यातही अशी शक्यता, तज्ज्ञांमध्ये चर्चा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : खालापूर येथील इर्शाळवाडीवर कोसळलेल्या संकटानंतर अशा प्रकारच्या घटना सह्याद्री पर्वतरांगांमध्ये येत्या काळातही घडण्याची शक्यता आहे का, असा प्रश्न विचारला जात आहे. यासंदर्भात स्थानिक पातळीवर होणारी जंगलतोड, मानवी हस्तक्षेप आणि वातावरण बदल याचा एकत्रित परिणाम या दुर्घटनांच्या माध्यमातून दिसत असल्याचे मत व्यक्त होत आहे.
इर्शाळवाडीवर मृत्यूची दरड, ४० घरे ढिगाऱ्याखाली; १६ मृतदेह हाती, ५० ते ६० जण बेपत्ता
या दुर्घटनेसाठी मानवनिर्मित आणि नैसर्गिक अशा दोन्ही गोष्टी कारणीभूत असल्याचे राज्य सरकारच्या भूस्खलन निवारण समितीचे सदस्य आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या भूशास्त्र विभागाचे निवृत्त विभागप्रमुख डॉ. सतीश ठिगळे यांनी सांगितले. ‘इर्शाळवाडी हे गाव समुद्रसपाटीपासून सुमारे ४५० मीटर उंचीवर वसलेले आहे. पूर्वी जिथे एखाद-दुसरे घर असते, त्या भागाचा विस्तार होत जातो. त्यासाठी जमिनीचे सपाटीकरण होते, झाडे तोडली जातात. चर खणले जातात. यामुळे उतार अस्थिर होतात. समतोलाकडून असमतोलाकडे हा प्रवास होतो. या भागामध्ये वार्षिक ३ हजार ५०० मिमी पाऊस पडतो. हे सगळे भूकंपप्रवण क्षेत्र आहे. येथे अजूनही भूकंपाचे धक्के बसतात. त्यातून डोंगरांना तडे जातात. पावसाळ्यात यातून खूप पाणी झिरपते. अशा झऱ्यांच्या जवळपासच दरडी कोसळतात असे लक्षात येईल’, असे डॉ. ठिगळे यांनी स्पष्ट केले. या दरडी अचानक कोसळत नाहीत. त्याची घरात पाणी घुसणे, भिंतींना तडे जाणे, झाडे कललेली दिसणे, जमिनीतून पाणी येणे अशी पूर्वचिन्हे दिसतात. याकडे दुर्लक्ष होते आणि मग डोंगरी भागात असे प्रकार घडतात असे समोर येते. कोकण विभागातील जिल्ह्यांमधील सह्याद्रीला लागून असलेले तालुके तसेच घाटमाथ्यावरील तालुके येथे या पार्श्वभूमीवर व्यापक सर्वेक्षण व्हायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
इर्शाळवाडीच्या लोकांनी फॉरेस्टच्या जागेत झोपड्या उभारलेल्या,फॉरेस्टनं त्या मोडल्या, गावकरी टाहो फोडत म्हणाला..
‘हिमालय हा अधिक नाजूक असून सह्याद्री त्या तुलनेत बळकट आहे. एका ठिकाणी घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण सह्याद्रीमध्ये अशाच घटना घडतील अशी भीती बाळगू नये’, असे मुंबई विद्यापीठाच्या भूगोल विभागाच्या सहायक प्राध्यापक डॉ. अपर्णा फडके यांनी स्पष्ट केले. ‘जंगलतोड, अनियमित पाऊस यामुळे इर्शाळवाडीसारख्या दुर्घटनांची शक्यता वर्तवली. अशा वेळी एखादी वाडी, एखादे गाव वाचण्यासाठी तिथे अभ्यास करून संरक्षक भिंत बांधण्याचा पर्याय प्रत्यक्षात आणला जाऊ शकतो,’ असे सध्या अमेरिकेत असणारे पीएचडीचे अभ्यासक आणि भूभौतिकशास्त्राचे संशोधक निनाद भागवत यांनी सुचवले.

इर्शाळवाडीवर दुःखाचा डोंगर, नातेवाईकांचा मन हेलावणारा हंबरडा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed