हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसाार, राज्यात पुढचे ५ दिवस मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र विदर्भातील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून मराठवाड्यासह इतर काही भागात मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.
राज्यासाठी ५ दिवसांचा येलो अलर्ट
खरंतर, यंदा मान्सून उशिराने दाखल झाला. जूनच्या शेवटी सुरू झालेल्या मान्सूनने चांगला जोर धरला आणि राज्यात सर्वत्र तुफान बरसला. पण जुलैच्या पहिल्या पंधरवड्यात पावसाचा जोर कमी झाल्याचं चित्र होतं. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्र वगळता मुंबई, ठाणे, पुणे, सातारा सांगली, कोल्हापूर या भागांमध्ये पाऊस कमी झाला. अशात आता हवामान खात्याकडून राज्यासाठी ५ दिवसांचा येलो अलर्ट जारी केला आहे. १७ जुलै रोजी रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.
पुढील ४ ते ५ दिवस राज्यात मुसळधार पावासाचा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे. सध्या पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, विदर्भात पाऊस सुरू आहे. तर तळकोकणासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. आज हवामान विभागाने कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात यलो अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे राज्यात आजही तुफान पाऊस असेल.