कृपाशंकर सिंह मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. तत्कालीन सरकारकडून त्यांना अभय देण्याचा प्रयत्न सुरू होता. त्यावेळी नगरच्या लोकहितवादी सेवा संघाचे संस्थापक मिलिंद मोभारकर यांनी मुख्य न्यायमूर्तींकडे तक्रार केली होती. नगरमधील एका केससाठी मोभारकर यांना कृपाशंकर सिंह यांच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणाची कागदपत्रे हवी होती. त्यासाठी त्यांनी माहितीच्या अधिकारात पाठपुरावा केला होता. मात्र, त्यांना ही कागदपत्रे देण्यात आली नाहीत.
त्यानंतर तत्कालीन विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी कृपाशंकर सिंह यांच्याविरूद्ध खटला दाखल करण्यास परवानगी नाकारली. त्यामुळे मोभारकर यांनी पाठपुरावा सुरू केला. पोलिस आणि राजकीय मंडळी संगमनमत करून कृपाशंकर सिंह यांना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे न्यायालयाने यामध्ये लक्ष घालावे, अशी मागणी मोभारकर यांनी केली होती.
त्यानंतर पुढे अनेक घडामोडी झाल्या. कृपाशंकर सिंह काँग्रेस सोडून भाजपमध्ये आले. आता त्यांना भाजपमध्ये महत्व मिळू लागले आहे. विरोधी पक्षाच्या सरकारकडे पाठपुरावा करूनही काही उपयोग झाला नाही. आता आपल्या विचारांचे सरकार असताना तर उलटे घडत आहे, हे पाहून मोभारकर यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
मोभारकर यांनी म्हटले आहे की, ‘आजची देवेंद्र फडणवीस आणि इतर दिग्गज नेते निर्मित एकंदर राज्यातील ‘अराजक’ राजकीय परिस्थिती पाहून एक सामान्य पण स्वाभिमानी पारंपारिक जनसंघीय भाजप मतदार व मोदी भक्त, या महाराष्ट्र राज्यात आता हताश झालो आहे. एक हातगाडीवर भाजी विकणारा भय्या ते हजारो, करोडोंची अवैध मालमत्ता कमावणाऱ्या मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीचा भ्रष्ट माजी अध्यक्ष कृपाशंकर सिंह यांच्याविरुध्द नगरमध्ये राहून मुंबईला स्वतःच्या गाडीने पदरमोड करुन चकरा मारुन त्याच्या गैरमालमत्तांची चौकशी पूर्णत्वास नेली. आता त्यांना महाराष्ट्र भाजप प्रदेश अध्यक्षांनी ‘मुंबई प्रदेश विधानसभा संयोजक’ या पदावर नियुक्त करुन पुलकीत केले आहे. याचा जाहीर निषेध म्हणून आज मी मला जून २०१५ पासून सरकारी खर्चाने देण्यात आलेले हत्यारबंद पोलिस अंगरक्षक संरक्षण काढून घेण्याची मागणी जिल्हा पोलिस अधिक्षकांकडे केली आहे’.