ऐरोली-काटई उन्नत मार्गाच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी महावितरणच्या अधिकाऱ्यांनी येत्या दोन महिन्यांमध्ये विद्युतवाहिन्या बदलण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे. तर, एमएमआरडीएच्या आधिकाऱ्यांनी मे २०२४पर्यंत ऐरोली-काटई उन्नत मार्गाच्या पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील काम पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे ऐरोली-काटई उन्नत मार्ग लांबणीवर पडत चालला आहे.
मे २०१८ मध्ये ऐरोली-काटई उन्नत मार्गाचे भूमिपूजन झाले होते. गेल्या पाच वर्षांपासून या मार्गाचे काम सुरू आहे. करोनासाथीमध्ये कामगारांची कमतरता असल्यामुळे या उन्नत मार्गाचे काम संथगतीने सुरू होते. तर, आता महावितरणच्या उच्च दाबाच्या विद्युत वाहिन्यांमुळे अडथळे निर्माण होत आहेत. खासदार राजन विचारे यांच्या पाहणी दौऱ्याप्रसंगी मे २०२४पर्यंत या दोन टप्प्यांतील मार्गाचे काम पूर्ण होणार असल्याचा विश्वास एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
यावेळी एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता साखळकर, कार्यकारी अभियंता राठोड, महावितरणचे अधीक्षक अभियंता गायकवाड, महावितरणचे अभियंता संजय वाडवे, नवी मुंबई महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुभाष सोनावणे, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक संजय बेंडे तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे, उपजिल्हा प्रमुख प्रकाश पाटील, डी. आर. पाटील आदी उपस्थित होते.
- पहिल्या टप्प्यामध्ये ठाणे-बेलापूर मार्ग ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ हा ३.४३ किमीचा असणार आहे. त्यामध्ये दोन भुयारी मार्ग तयार करण्यात आले आहेत. पहिल्या भुयारी मार्गात ३ + १ व दुसऱ्या मार्गात ३+१ अशा मार्गिका करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्याच्या प्रकल्पासाठी २३७.५४ कोटी खर्च करण्यात येणार आहे. त्याचे काम ५६ टक्के पूर्ण झाले आहे.
- दुसरा टप्पा ऐरोली पुलापासून ठाणे-बेलापूर मार्गावरील भारत बिजलीपर्यंत असणार आहे. त्यासाठी एकूण २७५.९० कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. या मार्गाचे ६९ टक्के काम पूर्ण झाले आहे. त्यामध्ये ऐरोली येथे रेल्वेमार्गावर ६५ मीटरचे दोन गर्डर टाकण्यात येणार आहेत. त्यासाठी रेल्वेकडून परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच, गणेश नगर येथेही खांब उभे करण्यासाठी महावितरणच्या विद्युतवाहिन्यांचा अडथळा निर्माण होत आहे.
नवी मुंबईकरांना मिळणार दिलासा
ऐरोली-काटई उन्नत मार्ग हा नवी मुंबईतून जात असला तरी नवी मुंबईकरांना चढण्या व उतरण्यासाठी येथे मार्गिका नव्हती. त्यामुळे या ठिकाणी मार्गिका व्हावी, यासाठी लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला होता. अखेर या मागणीची दखल घेऊन ठाणे-बेलापूर मार्गावर चढण्या व उतरण्यासाठी ऐरोली-काटई मार्गाला जोडणारी मार्गिका ठेवण्यात येणार असून त्यासाठी १०० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यानुसार, रॅम्प उभे करण्याचे काम लवकर सुरू होणार आहे, असे खासदार राजन विचारे यांनी यावेळी स्पष्ट केले.