• Sat. Jun 13th, 2026

    राज्याचं पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून; ३ आठवडे चालणार कामकाज, यावेळी कोण असणार टार्गेट?

    राज्याचं पावसाळी अधिवेशन १७ जुलैपासून; ३ आठवडे चालणार कामकाज, यावेळी कोण असणार टार्गेट?

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन तीन आठवड्यांपर्यंत चालविण्याचा निर्णय शुक्रवारी विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ जुलै २०२३ रोजी सुरू होणार असून हे अधिवेशन ४ ऑगस्ट २०२३ पर्यंत चालेल. या १९ दिवसांच्या कालावधीतील अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाजाचे दिवस १५ असून शनिवार आणि रविवार असे चार दिवस सार्वजनिक सुट्ट्यांचे असणार आहेत.

    राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला येत्या १७ जुलैपासून सुरुवात होत आहे. या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या कामकाज सल्लागार समितीची बैठक शुक्रवारी विधानभवनात झाली. या बैठकीत झालेल्या निर्णयाची घोषणा विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर आणि विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली. विधिमंडळाच्या शतकोतर प्रवासाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ वाटचालीचे दस्ताऐवजीकरण करण्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सूचित केले. तर विधिमंडळाचा गौरवशाली इतिहास संदर्भग्रंथाच्या माध्यमातून जतन करण्याचे तसेच विविध परिसंवादाद्वारे विधिमंडळाच्या आजपर्यंतच्या कामकाजातून महत्त्वपूर्ण घटना, प्रसंगांना उजळा देणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करण्याची सूचना डॉ. गोऱ्हे यांनी मांडली. मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवानिमित्तच्या पार्श्वभूमीवर अभिनंदनाचा ठराव अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात सादर करण्याबाबत जयंत पाटील, अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांनी मांडलेल्या सूचनेवर अध्यक्ष नार्वेकर यांनी यावेळी संमती दर्शवत ठराव मांडण्याचा निर्णय घेतला.

    विधानभवनात पार पडलेल्या या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह विधानसभा सदस्य छगन भुजबळ, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, गिरीश महाजन, अशोक चव्हाण, उदय सामंत, अमिन पटेल, आशीष शेलार, नरहरी झिरवाळ, तसेच विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आदी उपस्थित होते.

    महाविकास आघाडीची बैठक

    दरम्यान, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीपूर्वी महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादीचे जयंत पाटील, काँग्रेसचे अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, शिवसेनेचे आदित्य ठाकरे आदी उपस्थित होते. या बैठकीत पावसाळी अधिवेशनातील रणनीतीवर चर्चा करण्यात आली.
    संसदेच्या पावसाळी अधिवेशनाची तारीख ठरली; विरोधक कोणत्या मुद्द्यावर मोदी सरकारशी भिडणार?
    गोऱ्हे यांच्या विरोधातील प्रस्ताव मागे

    भाजपकडून नीलम गोऱ्हे यांच्यावर दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव मागे घेणार असल्याचे समजते. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत प्रवीण दरेकर यांनी हा प्रस्ताव मांडला होता. तर प्रसाद लाड यांनी या प्रस्तावाला अनुमोदन दिले आहे. उपसभापती नीलम गोऱ्हे पक्षपाती भूमिका घेत असल्याचा आरोप दरेकर यांनी विरोधीपक्ष नेते असताना केला होता. यानंतर त्यांनी गोऱ्हे यांच्याविरोधात सभापतींकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. मात्र आता हा दाखल करण्यात आलेला अविश्वास प्रस्ताव मागे घ्यावा असा प्रस्ताव दरेकर यांनी मांडला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed