• Sat. Sep 21st, 2024

शिवरायांचं उदाहरण, भाजपवर शरसंधान, दादांचं बंड कोल्हेंच्या जिव्हारी,राजीनाम्याचं भावुक पत्र

शिवरायांचं उदाहरण, भाजपवर शरसंधान, दादांचं बंड कोल्हेंच्या जिव्हारी,राजीनाम्याचं भावुक पत्र

मुंबई : अजित पवार यांच्या शपथविधीला उपस्थित राहिल्यानंतर २४ तासांतच नैतिकतेची जाणीव झाल्यानंतर शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपण शरद पवार यांच्यामागेच असल्याचं स्पष्ट केलं. आज त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. पदाचा मोह न बाळगता लोकशाही मूल्ये टिकवण्याच्या आपल्या संघर्षात एक कार्यकर्ता म्हणून निश्चित सहभागी असेन, असं सांगतानाच लोकशाहीप्रणाली विषयी अनास्था निर्माण करण्याचं पाप या महाराष्ट्रात केवळ सत्तेसाठी घडविण्यात येतंय अशा भावना निर्माण झाल्याने राजीनामा देण्याचा विचार अमोल कोल्हे यांनी बोलून दाखवला तसेच शरद पवार यांनी याबाबत मार्गदर्शन करावं, असंही त्यांनी म्हटलंय.

आदरणीय साहेब, सस्नेह जय शिवराय

आपण माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तीला लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. जनतेचे, शेतकऱ्याचे, राज्याचे, देशाचे प्रश्न मांडण्याची संधी दिली. तसेच मी प्रतिनिधित्व करत असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शनही केले, त्याबद्दल मनापासून आभार!

परंतु सध्याची राजकीय परिस्थिती पाहून अनेक प्रश्न निर्माण झाले. पक्ष फोडणे, आमदारांची पळवापळवी, काहीही करून सत्ता मिळवण्याचा अट्टाहास हे सर्व पाहून लोकशाहीतील तत्त्व, मूल्य, लोकप्रतिनिधींची जबाबदारी, उत्तरदायित्व, नैतिकता आणि विश्वासार्हता या गोष्टींविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. जर असं चित्र असेल तर सर्वसामान्य मतदारांनी ठेवलेल्या विश्वासाचं काय? आणि सुशिक्षित तरुणाईच्या मनात राजकारणाविषयी आणि एकूणच लोकशाही प्रणाली विषयी अनास्था निर्माण करण्याचं पाप या महाराष्ट्रात केवळ सत्तेसाठी घडविण्यात येणाऱ्या घटना करतील याचे शल्य मनाला बोचत आहे.

अजितदादांनी तुमची हकालपट्टी केली, जयंतरावांनी रोखठोक उत्तर देऊन विषय संपवला
साहेब, कलाकार म्हणून काम करताना मी सर्वाधिक भूमिका छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या केल्या आहेत. 350 वर्षानंतर नैतिक अधिष्ठान असलेलं स्वराज्य निर्माण करूनही त्या स्वराज्याला माझं नाही तर रयतेच स्वराज्य’ म्हणणान्या महाराजांचा आदर्श मनात ठेवून मी राजकारणात आलो परंतु स्वराज्याच्या उदात्त ध्येयासाठी वतनावर पाणी सोडणाऱ्या कान्होजी जेधे याच्याऐवजी सत्तेसाठी वाटेल त्या थराला जाणारी सध्या महाराष्ट्रात निर्माण झालेली राजकीय संस्कृती मनाला पटत नाही, आणि नैतिकतेच्या पार्श्वभूमीवर मी माझा खासदारकीचा राजीनामा देण्याचा विचार करत आहे.

पक्षावर दावा करण्याइतपत अजितदादांना अक्कल नाही, त्यांना दिल्लीतून आदेश : संजय राऊत
म्हणूनच या सर्व निराशाजनक परिस्थितीत आपण आशेचा एकमेव किरण आहात. पदाचा मोह न बाळगता लोकशाही मूल्ये टिकवण्याच्या आपल्या संघर्षात एक कार्यकर्ता म्हणून निश्चित सहभागी असेन. कृपया याबाबत मार्गदर्शन करावे, ही विनंती…

कळावे,
डॉ. अमोल रामसिंग कोल्हे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed