आदरणीय साहेब, सस्नेह जय शिवराय
आपण माझ्यासारख्या कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तीला लोकसभेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. जनतेचे, शेतकऱ्याचे, राज्याचे, देशाचे प्रश्न मांडण्याची संधी दिली. तसेच मी प्रतिनिधित्व करत असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शनही केले, त्याबद्दल मनापासून आभार!
परंतु सध्याची राजकीय परिस्थिती पाहून अनेक प्रश्न निर्माण झाले. पक्ष फोडणे, आमदारांची पळवापळवी, काहीही करून सत्ता मिळवण्याचा अट्टाहास हे सर्व पाहून लोकशाहीतील तत्त्व, मूल्य, लोकप्रतिनिधींची जबाबदारी, उत्तरदायित्व, नैतिकता आणि विश्वासार्हता या गोष्टींविषयी संभ्रम निर्माण झाला आहे. जर असं चित्र असेल तर सर्वसामान्य मतदारांनी ठेवलेल्या विश्वासाचं काय? आणि सुशिक्षित तरुणाईच्या मनात राजकारणाविषयी आणि एकूणच लोकशाही प्रणाली विषयी अनास्था निर्माण करण्याचं पाप या महाराष्ट्रात केवळ सत्तेसाठी घडविण्यात येणाऱ्या घटना करतील याचे शल्य मनाला बोचत आहे.
साहेब, कलाकार म्हणून काम करताना मी सर्वाधिक भूमिका छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या केल्या आहेत. 350 वर्षानंतर नैतिक अधिष्ठान असलेलं स्वराज्य निर्माण करूनही त्या स्वराज्याला माझं नाही तर रयतेच स्वराज्य’ म्हणणान्या महाराजांचा आदर्श मनात ठेवून मी राजकारणात आलो परंतु स्वराज्याच्या उदात्त ध्येयासाठी वतनावर पाणी सोडणाऱ्या कान्होजी जेधे याच्याऐवजी सत्तेसाठी वाटेल त्या थराला जाणारी सध्या महाराष्ट्रात निर्माण झालेली राजकीय संस्कृती मनाला पटत नाही, आणि नैतिकतेच्या पार्श्वभूमीवर मी माझा खासदारकीचा राजीनामा देण्याचा विचार करत आहे.
म्हणूनच या सर्व निराशाजनक परिस्थितीत आपण आशेचा एकमेव किरण आहात. पदाचा मोह न बाळगता लोकशाही मूल्ये टिकवण्याच्या आपल्या संघर्षात एक कार्यकर्ता म्हणून निश्चित सहभागी असेन. कृपया याबाबत मार्गदर्शन करावे, ही विनंती…
कळावे,
डॉ. अमोल रामसिंग कोल्हे