मुक्ताईनगर तालुक्यातील पारंबी गावात शेतकरी संतोष झांबरे हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. त्यांची गावाबाहेर शेती आहे आणि या शेतीवर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागतो. संतोष झांबरे यांना चेतन आणि गौरव अशी दोन मुलं आहेत. गौरव हा शाळेत जाण्यापूर्वी त्याचा मोठा भाऊ गौरव याच्यासोबत शेतात जाऊन येतो असं सांगून घराबाहेर पडला. चेतन आणि गौरव ही दोन्ही शेतात गेले. यादरम्यान शेतात काम करतांना गौरव याला विजेचा धक्का बसला.
गौरवच्या आवाजाने त्याचा मोठा भाऊ त्याठिकाणी धावत आला आणि गौरवला विजेचा धक्का बसल्याचे त्याच्या लक्षात आले. चेतन याने गौरवला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, यात विजेचा प्रवाह एवढा जोरदार होता की, यात चेतन हा सुध्दा जखमी झाला. यानंतर चेतन दुसरा काही प्रयत्न करेल तोपर्यंत त्याच्या डोळ्यादेखत त्याचा लहान भाऊ गौरवचा मृत्यू झाला होता.
आजूबाजूचे शेतकरी घटनास्थळी धावत आले. त्यानंतर घटनेची माहिती कुटुंबियांना कळवण्यात आली. काही वेळापूर्वी घरुन शेतात आलेल्या मुलाचा मृतदेह पाहून आईने एकच आक्रोश केला. दोघा भावंडांना तात्काळ मुक्ताईनगर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. या ठिकाणाहून गौरवला मलकापूर येथे हलविण्यात आले. या ठिकाणी गौरवला डॉक्टरांनी मयत घोषित केले.
चेतन याच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आपल्या डोळ्यादेखत लहान भावाचा करुण अंत झाल्याच्या या घटनेनं चेतनला मोठा धक्का बसला आहे. गौरव हा नुकताच दहावीची परीक्षा ८३ टक्क्यांनी उत्तीर्ण होऊन त्याने अकरावीत प्रवेश घेतलेला होता. या घटनेनं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.