• Mon. Mar 9th, 2026
    तात्यांची पोस्ट- राजकारण नको जंगलात जातो, थेट संभाजीराजे फोन कितीही मनाला पटलं नाही…

    पुणे: विरोधी पक्षनेते असताना पक्षविरोधी भूमिका घेऊन अजित पवार थेट शिंदे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात सामिल झाल्याने राजकारणाल्या धुरीणांना देखील राजकीय गणितं कळेनाशी झाली. महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पॅटर्नची संपूर्ण देशात चर्चा होतीये. महाराष्ट्रातील लोकही असल्या राजकारणाला कंटाळले आहेत. मनसे नेते वसंत मोरे यांनी याच आशयाची पोस्ट करुन सगळं सोडून जंगलात जावंसं वाटतंय, अशी पोस्ट केली. राजकारणाबद्दल आलेलं नैराश्य पाहून माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी थेट वसंत मोरे यांना फोन करुन त्यांची समजूत काढली. कितीही मनाला पटलं नाही तरी चुकीचा निर्णय घ्यायचा नाही. आपल्यासारखी माणसं राजकारणात हवी आहेत, असं संभाजीराजे वसंततात्यांना म्हणाले.

    “पार पार राजकारणावरचा विश्वास उडालाय राव… लांब कुठं तरी जंगलात जाऊन शेती करत बसावं असे वाटतंय…” असं दोनच ओळीत वसंत मोरे यांनी राजकीय परिस्थितीवर भाष्य केलं आहे. गालावर हात ठेवून विचारात पडल्याचा फोटो वसंत मोरे यांनी शेअर केला आहे. तात्यांची ही पोस्ट खूपच व्हायरल झाली. अनेकांनी या पोस्टवर उड्या मारुन आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या. तसेच आजचं राजकारण पाहून आमच्याही मनात तश्याच भावना असल्याचं तात्यांच्या पोस्टखाली कमेंट करुन अनेकांनी सांगितलं. हीच पोस्ट संभाजीराजे यांच्या नजरेस पडली. त्यांनी तत्काळ तात्यांना फोन करुन त्यांना धीर दिला.

    संभाजीराजे काय म्हणाले?

    तात्या मी आपली पोस्ट पाहिली. आपण नेहमी परखड भूमिका घेत असता. चांगल्याला चांगलं-वाईटाला वाईट म्हणत असता. त्याचमुळे आपण कुठल्या पक्षात आहात हे न पाहता मी आपल्याला फोन केला. जंगलात वगैरे जायची भाषा आपण केली. ती बरोबर नाही. महाराष्ट्रात जे चाललंय ते चुकीचंच आहे, हे जसं आपल्याला वाटतंय तसंच आम्हालाही वाटतंय. पण म्हणून निराश होण्याचं कारण नाही. आपल्यासारख्या माणसांची राजकारणात खूप गरज आहे. खरं तर आपल्यासारख्या माणसांच्या यामुळे अधिक जबाबदाऱ्या वाढल्यात, अशी जाणीवही संभाजीराजेंनी वसंत तात्यांना करुन दिली.

    अजित पवारांचा शपथविधी अन् पडद्यामागच्या घडामोडी, पत्रकार सुधीर सूर्यवंशी यांचं सविस्तर विश्लेषण

    कधी पहाटेचा शपथविधी ऐकायचा… कधी भर दुपारी असे प्रकार… घाणेरड्या विचारांचे लोक राजकारणात आहेत. असलं राजकारण पाहण्यापेक्षा जंगलात गेलेलं बरं… अशी खंतही तात्यांनी पुन्हा संभाजीराजेंना बोलून दाखवली. त्यावर संभाजीराजे म्हणाले, अशा लोकांना घाणीत जाऊ द्या ना.. आपल्याला काय करायचंय… आपल्या मनाला कितीही पटलं नाही तरी चुकीचा विचार करायचा नाही. उलट आपली जबाबदारी अधिक वाढलीये, असं राजे तात्यांना म्हणाले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed