समृद्धी महामार्गावर सिंदखेड राजा तालुक्यातील पिंपळखुटा शिवारात खासगी बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. या घटनेने महाराष्ट्र हादरला असून यात वर्ध्यातील एक-दोन नाही तर तब्बल १४ व्यक्तींचा समावेश आहे.
मृतकांमध्ये एक तनिषा तायडे नावाच्या मुलीचाही होरपळून मृत्यू झाल्याने परिवाराचे अवसान गळाले. तिची बहीण मेघना ही पुण्यात आयटी इंडस्ट्रीमध्ये नोकरीवर असून ती तनिषाची वाट बघत होती. तनिषाला बहिणीने १२ वी नंतर उच्च शिक्षणासाठी पुण्यात बोलावले होते.
आता तनिषा शिक्षणाकरिता पुण्यात येणार, उद्यापासून तिचा दिनक्रम सुरु होणार म्हणून ती तनिषा गाडीमध्ये बसल्यापासून सतत संपर्कात होती. त्या दोघींनीही पावणे बारा वाजतापर्यंत चॅटिंग केलं. खासगी बसचा पहिला प्रवास असल्याने घाबरलेल्या धाकट्या बहिणीला धीर देण्याचे काम थोरल्या मेघनाने केलं. तिच्या सांगण्यावरुनच तनिषा झोपी गेली, ती कायमचीच. आता तोच संदेश पाहून मेघनाही पूर्णत: ढासळली. मोठ्या हिंमतीने आणि मोबाईलवरील त्या अखेरच्या संदेशासोबतच सिंदखेडराजा येथे आज तिच्यावर सामूहिक अंत्यसंस्कार झाले.
महिन्याभरापूर्वी तनिषाचे वडील प्रशांत तायडे यांचे ब्रेन हॅमरेजने निधन झालं. घरातील कर्ता व्यक्ती गेल्याने आई, मेघना आणि तनिषा हे तीनच सदस्य राहिले. मेघनाने घराची पूर्णत: जबाबदारी स्वीकारली. मेघना ही पुण्यात आयटी कंपनीत नोकरीवर आहे. त्यामुळे बारावीनंतर उच्च शिक्षणाकरिता तनिषालाही पुण्यात बोलावण्याचा निर्णय मेघनाने घेतला. तनिषाची फर्ग्युसन महाविद्यालयात बीएससीला अॅडमीशन घेतली. त्यामुळे तनिषा ही पुण्याला जाण्यासाठी निघाली आणि देवाघरी पोहोचली.