• Sat. Sep 21st, 2024
पालिकेच्या काही रुग्णालयांत चाचण्यांची निदाननिश्चितीच नाही; रुग्णांचे आकडे किती खरे?

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : प्रत्येक वर्षी पावसाळ्यात साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव सातत्याने वाढता असतानाही डेंग्यू, मलेरिया, लेप्टोस्पायरोसिससारख्या चाचण्यांची निदान निश्चिती पालिकेच्या काही रुग्णालयांमधून केली जात नाही. सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयामध्ये असा प्रकार सुरू असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. त्यामुळे विविध रुग्णालयांमध्ये दाखल साथीच्या आजारांच्या रुग्णांची जी आकडेवारी पालिका देते ती कमी असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

‘महाराष्ट्र टाइम्स’कडे उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, सांताक्रूझ येथील व्ही. एन. देसाई रुग्णालयाने २०२२, २०२१ आणि २०२० या वर्षांमध्ये १० हजार ९७५, ८०३३ आणि ७७४६ डेंग्यूच्या चाचण्या केल्या. या चाचण्यांची एकत्रित संख्या २६,७५४ इतकी होती. या वर्षांत अनुक्रमे ६७६, १०१ आणि ३९ चाचण्या डेंग्यूसाठी पॉझिटिव्ह आल्या. मात्र रुग्णालयाने एलिसा चाचण्यांद्वारे कोणत्याही नमुन्यांचे निश्चित निदान केले नाही. एलिसा चाचणीसह आरटीपीसीआर चाचण्यांसाठी कस्तुरबा रुग्णालयामध्येही एकही नमुना पाठवण्यात आला नाही.

मुंबईतील आणखी एक धोकादायक पूल पाडला; प्रवाशांना घ्यावा लागणार दीड किमीचा फेरा
सन २०२२, २०२१ आणि २०२०मध्ये लेप्टोस्पायरोसिसच्या अनुक्रमे ९८२९, ९५३४ आणि ५७६० अशा एकूण २५,१०३ चाचण्या करण्यात आल्या. या तिन्ही वर्षांत एकूण ९४ नमुने पॉझिटिव्ह आले. मात्र येथेही एलिसा वा आरटीपीसीआर चाचण्यांनी निदाननिश्चिती करण्यात आली नाही. पालिकेने रॅपिड पद्धतीद्वारे पॉझिटिव्ह आढळणाऱ्या चाचण्यांची संख्या अंतर्भूत न केल्याने नोंदवण्यात आलेली रुग्णसंख्या कमी असण्याची शक्यता आहे. रॅपिड पद्धतीद्वारे पॉझिटिव्ह आढळणारे ९८ टक्के नमुने हे एलिसा तसेच आरटीपीसीआर चाचण्यांद्वारे पॉझिटिव्ह येतात.

रॅपिड चाचणी म्हणजे काय?

या आजारांची रॅपिड टेस्ट नावाच्या पद्धतीद्वारे चाचणी केली जाते. पालिका ही निदाननिश्चिती चाचणी ग्राह्य धरत नाही. ही चाचणी पॉझिटिव्ह असली तरीही आरटीपीसीआर चाचणीद्वारे निदाननिश्चिती केली जाते. ही चाचणी अतिशय महागडी असून ती केवळ कस्तुरबा रुग्णालयामध्येच करण्यात येते. सर्व पॉझिटिव्ह नमुने हे आरटीपीसीआरद्वारे तपासले जाऊ शकत नाहीत. त्यामुळे रॅपिड चाचणीद्वारे पॉझिटिव्ह आलेले नमुने एलिसा नावाच्या पद्धतीद्वारे पुन्हा तपासले जातात. एलिसा चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर ती आरटीपीसीआर करण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयास पाठवावी लागते.

मशीनचा वापर का नाही?

या चाचण्यांच्या निदाननिश्चितीसाठी रुग्णालयाला देण्यात आलेले यंत्र सन २०१६पासून विनावापर बंद आहे. त्याचा योग्य वापर झाला असता तर आजाराच्या निश्चित प्रकरणांची नोंद झाली असती. २,२०,४४८ रुपये किंमतीचे हे मशीन २९ डिसेंबर २०१६ रोजी पॅथॉलॉजी प्रयोगशाळेत लावण्यात आले होते. मात्र तांत्रिक समस्यांमुळे आणि या चाचण्यांची नोंद ठेवण्यासाठी लागणारा संगणक उपलब्ध नसल्याने ही नोंद करण्यात आली नसल्याचे कारण देण्यात आले आहे.

मनोरी गावातील स्थानिकांवर नवे संकट; भर पावसात डोक्यावरचे छप्पर हरवण्याची भीती
आर्थिक तरतूद नसताना मशीन खरेदीची घाई का करण्यात आली, असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. या चाचण्या केल्यास तंत्रज्ञांवर त्याचा अतिरिक्त ताण येतो. त्यामुळे या चाचण्या टाळण्याकडे त्यांचा कल असतो, याकडे रुग्णालयातील डॉक्टरांनी लक्ष वेधले आहे. मागील साडेसहा वर्षांपासून हे प्रकरण प्रलंबित आहे, तर काही रुग्णालयांनी २०१६मध्येच इतर रुग्णालयांना हे मशीन उपलब्ध करून दिले होते ते त्यांनी इतर रुग्णालयांना देऊन टाकले व या चाचण्या करण्याच्या प्रक्रियेतून सुटका करून घेतली.

एलिसा चाचण्या के. बी. भाभा किंवा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यासारख्या रुग्णालयांमध्ये केल्या जातात. त्या व्ही. एन. देसाईसारख्या मोठ्या रुग्णालयामध्ये करायला हव्यात. तसे न झाल्यास अनेक छोट्या रुग्णालयांमध्ये या रुग्णसंख्येची नोंद होणार नाही, या शक्यतेकडे आरोग्यहक्क कार्यकर्ते अॅड. तुषार भोसले यांनी लक्ष वेधले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed