• Fri. Mar 6th, 2026
    मुंबईतील आणखी एक धोकादायक पूल पाडला; प्रवाशांना घ्यावा लागणार दीड किमीचा फेरा

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : गिरगाव चौपाटी येथील सुमारे ७० वर्षांहून अधिक जुना अंबालाल पटेल पूल धोकादायक झाल्याने महापालिकेच्या हद्दीतील बाजू पाडण्यात आली असून पश्चिम रेल्वे मार्गावरील पाडकाम बाकी आहे. चौपाटीकडून ऑपेरा हाऊस, गिरगावला जोडणारा हा एकमेव पूल होता. गिरगावात जाण्यासाठी आता दक्षिणेकडील मित्तल रुग्णालयाच्या पुलाचा पर्याय असला तरी तिथपर्यंत पोहोचण्यास नागरिकांना दीड किमीचा फेरा घालावा लागत आहे. त्यामुळे रेल्वेच्या हद्दीतील बाजू पाडून तातडीने पुलाचे काम सुरू करण्याची मागणी गिरगावकरांनी केली आहे.

    चर्नी रोड रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला गिरगाव चौपाटी, मफतलाल जलतरण तलावाजवळ १९५३मध्ये हा पूल बांधण्यात आला होता. या पुलाच्या बांधकामासाठी पटेल कुटुंबीयांनी देणगी दिली होती. पटेल पूल नावाने ओळखल्या जाणाऱ्या या पुलामुळे ऑपेरा हाऊस, गिरगाव परिसर चौपाटीशी जोडला गेला आहे.

    मनोरी गावातील स्थानिकांवर नवे संकट; भर पावसात डोक्यावरचे छप्पर हरवण्याची भीती
    २०१९ आणि २०२२मध्ये पालिकेने केलेल्या स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालानुसार पुलाच्या पुनर्बांधणीची शिफारस करण्यात आली होती. त्यामुळे २०२२मध्ये पालिकेने हा पूल धोकादायक असल्याचे जाहीर केला होता. गेल्या महिन्यात पालिकेच्या हद्दीतील बाजू पाडण्यात आली असून एका बाजूचे जिने पाडणे शिल्लक आहे. रेल्वे मार्गावरील बाजू रेल्वे प्रशासनाला पाडण्याची विनंती करण्यात आली आहे.

    पश्चिमेकडील बाजू पाडण्यात आल्याने ऑपेरा हाऊस व गिरगावातील नागरिकांची गैरसोय होऊ लागली आहे. पूर्वेकडून पश्चिमेला जाण्यासाठी चौपाटीच्या बाजूने हा एकमेव पूल होता. चर्नी रोड रेल्वे स्थानकाच्या पुलाचा वापर प्रवाशांव्यतिरिक्त अन्य नागरिकांना करता येत नसल्याने सरकारी मुद्रणालयाकडील मित्तल आयुर्वेदिक रुग्णालयाच्या शेजारच्या पुलाचा पर्याय आहे. मात्र तिथपर्यंतचे अंतर खूप असून रात्रीच्या वेळेस या पुलावर दारुडे आणि गर्दुल्ल्यांचा वावर असतो. त्यामुळे नागरिक संध्याकाळनंतर या पुलाचा वापर करण्यास घाबरतात, अशी माहिती ”आम्ही गिरगावकर” संस्थेचे सचिव मिलिंद वेदपाठक यांनी दिली.

    Mumbai News: अमेरिकेतील प्रसिद्ध डॉक्टरांच्या मुलाचा मुंबईत मृत्यू, इमारतीच्या २२व्या मजल्यावरून खाली कोसळला
    नवीन पूल पर्यटकांनाही आकर्षित करेल…

    या पुलाच्या जागी अत्याधुनिक आणि नवीन तंत्रज्ञानासह नवीन पूल उभारण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. नागरिकांसह चौपाटीकडे येणाऱ्या पर्यटकांनाही हा पूल आकर्षित करेल अशी या पुलाची रचना असेल. या कामासाठी सल्लागार नियुक्त केला आहे. पुलाची रेल्वेवरील बाजू पाडण्यास रेल्वे प्रशासनाला कळविण्यात आले आहे. सर्व परवानग्या घेतल्यानंतर येत्या काही महिन्यांत पुलाचे बांधकामाचे सुरू होईल, अशी माहिती पूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed