विनायक गोविंद क्षीरसागर (वय ३७) , योगेश दिलीप वाघ (वय १८), जतिन अनिल फावडे (वय २३), रविंद्र मोतीचंद चव्हाण (वय २२, रा. वणी मोठा कोळीवाडा) अशी अपघातात दुर्दैवी मृत्यू झालेल्या चौघा मित्रांची नावे आहेत. या अपघातामुळे वणी येथील चार कुटुंबांवर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण शहरावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त केली जात आहे.
सियाज कारने (एमएच ४१/व्ही ७७८७) सापुताऱ्याकडून वणीच्या दिशेने येत असताना समोरून येणाऱ्या क्रुझरची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर परिसरातील लोक मदतीसाठी धावले. त्यांनी जखमींना बाहेर काढले. गंभीर जखमींना नाशिक येथे दाखल करण्यात आले. कमळी युवराज गांगोडे (वय ४०), कल्पना सुभाष सोळसे (१९), तुळशीराम गोविंदा भोये (२८), ललिता युवराज कडाळे (३०), रोहिदास पांडुरंग कडाळे (२५), योगेश मधुकर सोळसे (१५), सुभाष काशिनाथ सोळसे (१५), देवेंद्र सुभाष सोळसे (४७), नेहल सुभाष सोळसे (७) गंभीर जखमी असून, त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. विनायक क्षीरसागर उर्फ काळाभाई हे ठाकरे गटाचे कट्टर शिवसैनिक म्हणून परिचित होते.
दरम्यान, कुटुंबाचा चरितार्थ चालवण्यासाठी धडपड करणाऱ्या तरुणांवर काळाने घाला घातल्याने आणि कुटुंबातील कर्ते तरुण हरपल्याने चार कुटुंबांवर मोठा आघात झाला आहे. चौघेही तरुण वणी शहरातील कोळीवाडा येथील रहिवासी होते. चौघांवर एकाच वेळी काल वणी येथील स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणात त नातेवाईक मित्रपरिवार जमा झाला होता.
