• Wed. Mar 11th, 2026
    अकरा जलकुंभांसाठी आता ऑक्टोबरचा वायदा; पाणीपुरवठा योजनेच्या कंत्राटदाराने दोनदा चुकवली अंतिम मुदत

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : अकरा जलकुंभांसाठी पाणीपुरवठा योजनेच्या कंत्राटदारासह महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने आता ऑक्टोबर महिन्याचा वायदा केला आहे. यापूर्वी दोन वेळा दिलेली डेडलाइन त्यांनी चुकवली असून, ऑक्टोबर महिन्याचा मुहूर्त साधला जाईल की नाही याबद्दल शंका व्यक्त केली जात आहे.

    सरकारने छत्रपती संभाजीनगर शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली. मुळात एक हजार ६८० कोटींची ही योजना होती, आता या योजनेची किंमत दोन हजार ७४० कोटी रुपये झाली आहे. पाणीपुरवठा योजनेचे काम सुरुवातीपासूनच संथ गतीने सुरू आहे. दिलेल्या मुदतीत हे काम होण्याची शक्यता नसल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पाणी योजनेच्या कंत्राटदाराच्या माध्यमातून ११ जलकुंभ प्राधान्याने बांधून द्यावेत अशी मागणी महापालिकेने केली आहे.
    Chh. Sambhajinagar : ग्रीड पाणीपुरवठा योजनेचे भूमिपूजन; गंगापूर-वैजापूरच्या ३७३ गावांना मिळणार पाणी
    अकरा जलकुंभांची ठिकाणेदेखील प्राधिकरणाला देण्यात आली. अकरा जलकुंभ प्राधान्याने ताब्यात मिळाले तर शहराच्या पाणीपुरवठ्याचा गॅप कमी करता येईल. सध्या पाचव्या दिवशी पाणीपुरवठा केला जातो. हे जलकुंभ मिळाले तर दोन दिवसांआड म्हणजे तिसऱ्या दिवशी पाणीपुरवठा करणे शक्य होईल, असे पालिकेचे म्हणणे आहे. त्यानुसार सरकारी, प्रशासकीय यंत्रणा प्राधिकरणासह कंत्राटदाराकडे पाठपुरावा करीत आहे.

    उन्हाळा सुरू होण्यापूर्वी म्हणजे मार्च महिन्याच्या सुरुवातीला ११ जलकुंभ पालिकेच्या ताब्यात देण्याचे प्राधिकरण आणि कंत्राटदाराने मान्य केले होते; पण मार्च महिना उलटून गेला तरी जलकुंभाच्या कामाची प्रगती समाधानकारक झाली नाही, त्यामुळे जुलै महिन्यात हे जलकुंभ पालिकेच्या ताब्यात दिले जातील, असे सांगण्यात आले. आता ऑक्टोबर महिना यासाठी उजाडेल अशी माहिती पालिकेचे कार्यकारी अभियंता एम. बी. काझी यांनी पत्रकारांना दिली.

    Sambhajinagar: पालिकेतील अधिकारी ACBच्या रडारवर, ६० हजार रुपयांच्या लाचेचे प्रकरण भोवणार?
    ‘जायकवाडी धरणात क्रॉफर्ड डॅमचे काम पूर्ण झाले आहे. डॅमची उंची वाढवणे, मजबूतीकरण करणे ही कामे सध्या सुरू आहेत. डॅममधील पाणी आणि गाळ काढण्यात येत आहे. दोन-तीन दिवसांत हे काम पूर्ण होईल,’ असे काझी यांनी सांगितले. ‘जायकवाडी ते नक्षत्रवाडी दरम्यान ३९ किलोमीटर लांबीची दोन हजार ५०० मिलीमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी टाकण्याचे काम केले जाणार आहे. आतापर्यंत १७ किलोमीटरचे काम झाले आहे, जलवाहिनी टाकण्याच्या कामासाठी अडथळा ठरणारे वीजेचे खांब काढण्याचे काम सुरू आहे. जुलै अखेरपर्यंत हे काम पूर्ण होईल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed