महाबळेश्वर, सातारा, कास, बामनोली परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून दरडी कोसळण्याचे सत्र सुरू झाले. त्यातच छोट्या मोठ्या दरडी कोसळल्यामुळे जागोजाग वाहतूक ठप्प होत आहे. आज यवतेश्वर घाटात दरड कोसळल्यामुळे कास व सातारकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. रस्त्यावर भले मोठे दगड आल्याने दोन्ही बाजूनी वाहनांच्या रंगाच रांगा लागल्या होत्या.
सातारहून यवतेश्वर, सांबरवाडी, पिलानी, घाटजाई व कासकडे घरी जाणाऱ्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. तसेच कासकडून साताऱ्याकडे येणाऱ्या पर्यटकांच्या गाड्या घाटात अडकल्याने त्यांना रस्ता मोकळा होईपर्यंत रात्री उशिरापर्यंत थांबावे लागले. सातारा तालुका पोलिस आणि शिवेंद्रराजे ट्रेकर्सची टीम तात्काळ घटनास्थळी पोहोचून रस्त्यावरील दगड हटवण्याचे काम सुरू केले आहे.
यवतेश्वर घाटात नव्यानेच संरक्षक भिंतीचे बांधकाम करण्यात आले आहे. मात्र, पहिल्याच पावसात संरक्षक भिंतीचा कठडा ढासळल्याने घाटातील सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सततच्या पावसाने यवतेश्वर घाटातील डोंगरकडाही निसरडा झाला आहे. घाटात अधूनमधून छोट्या मोठ्या दरडी कोसळत आहेत. त्यामुळे यवतेश्वर घाटातून रात्री कोणीही प्रवास करू नये, असे आवाहन करून यवतेश्वर घाटाच्या पायथ्याशी राहणाऱ्या गावातील नागरिकांनाही सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन व सातारा पोलिसांनी केले आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी महाबळेश्वरहून कुंभरोशीकडे जाताना मेटतळेजवळ दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली होती. दरड कोसळल्याने दगड व मातीचा ढीग रस्त्यावर पडला होता. या घटनेत आंबेनळी घाट दोन्ही बाजूंकडून वाहतुकीसाठी तात्पुरता बंद केला होती.