मध्य प्रदेशातून कामानिमित्त सातपूर परिसरात वास्तव्यास आलेल्या नाठे कुटुंबाने भाडेतत्वावर खोली घेतली. या खोलीत सुमन व तिच्या पतीमध्ये सोमवारी सकाळी जोरदार भांडण झाले. भांडणानंतर काहीवेळाने पती रघुनाथ याने पत्नीच्या गळ्यावर चाकूने वार केला. यात सुमन मृत झाल्यानंतर त्याने घरातून पोबारा केला. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच उपायुक्त चंद्रकांत खांडवी, सहायक आयुक्त शेखर देशमुख, वसंत मोरे, वरिष्ठ निरीक्षक पंकज भालेराव, विजय ढमाळ यांच्या पथकांसह श्वान पथके व गुन्हे पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचमाना करून पुढील तपास सुरू करण्यात आला. याप्रकरणी सातपूर पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तीन दिवसांपूर्वीच नाशिकमध्ये
नाठे कुटुंबीय तीन दिवसांपूर्वीच कामानिमित्त नाशिकमध्ये वास्तव्यास आल्याची माहिती तपासी अधिकारी सहाय्यक पोलिस निरीक्षक धीरज गवारे यांनी दिली. त्यामागील कारणांसह सीसीटीव्हीच्या आधारे पोलिस संशयिताचा माग काढत आहेत. याप्रकरणी सोमवारी रात्री उशिरापर्यंत अनेकांची जबाबनोंदणीसह तांत्रिक तपास सुरू होता.
चिमुकल्यांचा आक्रोश
मृत सुमन यांच्या पश्चात संशयित पतीसह अकरा वर्षीय मुलगी व सहा वर्षांचा मुलगा आहे. पतीने पत्नीचा खून करण्यापूर्वी दोन्ही मुलांना शेजारील घरात खेळण्यासाठी पाठवले. त्यानंतर हे कृत्य करून तो पसार झाला. रहिवाशांना ही माहिती मिळताच पोलिसांना ‘कॉल’ देण्यात आला. मृतावस्थेत असलेल्या आईला पाहून दोन्ही चिमुकल्यांनी टाहो फोडला. त्यांच्या आक्रोशाने सगळेच हळहळले.
‘त्या’ खुनाची उकल नाही
गत रविवारी (दि. १८) रात्री जेलरोडच्या लोखंडे मळ्यातील हणमंतनगरातील घरात एकट्या असलेल्या वृद्ध महिलेवर वार करण्यात आले. सुरेखा उर्फ पुष्पा श्रीधर बेलेकर (६०) यांच्या अंगावरील काही दागिन्यांची लूट करून त्यांचा खून करण्यात आला. याप्रकरणी सात दिवसांनंतरही उपनगर पोलिसांना सुगावा लागलेला नाही. त्यामुळे या खुनाची उकल झाली नसताना शहरात आठ दिवसांत दुसऱ्यांदा महिलेचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे.