• Sat. Sep 21st, 2024
अनेकदा अपयश, पण तरीही जिद्द कायम; अखेर पोरीने करून दाखवलं, MPSC परीक्षेत राज्यात पहिली!

नाशिक : जिद्द, चिकाटी आणि कष्ट करण्याची इच्छा असेल तर आपण आपल्या जीवनात नक्कीच यशस्वी होऊ शकतो, असं म्हटलं जातं. याचाच प्रत्यय नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील पोर्णिमा गावित हिच्या यशाच्या माध्यमातून आला आहे. जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी येथील पौर्णिमा गावित ही महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत राज्यात पहिली आली आहे. पौर्णिमाच्या या यशाने तिच्या कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. अथक परिश्रम आणि चिकाटीच्या जोरावर पौर्णिमाने यशाचे शिखर गाठलं. तिच्या या यशाने दिंडोरी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

दिंडोरी तालुक्यातील अहिवंतवाडी हे पौर्णिमाचे गाव आहे. या वाडीत पौर्णिमाचे वडील विठोबा शिवराम गावित हे प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. पौर्णिमा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून पालिका उपायुक्ताची परीक्षा उत्तीर्ण झाली आहे. मुळात लहानपणापासूनच ती शिक्षणात अग्रेसर होती. तिचे प्राथमिक शिक्षण हे अहिवंतवाडीत झाले, तर सहावी ते बारावी पर्यंतचे शिक्षण हे दिंडोरी तालुक्यातील खेडगाव येथील नवोदय विद्यालयात झाले आहे. त्यानंतर पुढील शिक्षण घेऊन तिने राहुरी येथील कृषी विद्यापीठात बीएससी अॅग्रीकल्चरची पदवी प्राप्त केली. त्यानंतर पौर्णिमाने आयआयटी खरगपूर येथे एमएससी अॅग्रीकल्चरची पदवी प्राप्त केली.

सासर अन् माहेरची भक्कम साथ, प्रामाणिकपणाच्या जोरावर यशाशी गाठ; MPSC मध्ये तिसऱ्यांदा घवघवीत यश

पौर्णिमाने एवढे शिक्षण घेऊनही न थांबता एमएससी अॅग्रीकल्चरची पदवी प्राप्त केल्यानंतर पुणे येथील स्पर्धा परीक्षा केंद्राची प्रवेश परीक्षा देत उत्तीर्ण होत प्रवेश मिळवला. त्यानंतर सलग दोन वर्ष रात्रीचा दिवस करत मेहनत घेत अभ्यास केला. सुरुवातीला तिने यूपीएससी परीक्षा दिली, मात्र त्यात यश येत नव्हते. नंतरच्या काळात करोनामुळे घरची वाट धरावी लागली. या काळात तिने एमपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिल्याच प्रयत्नात ती उत्तीर्ण होत २०२० साली कक्ष अधिकारी म्हणून मंत्रालयात निवडही झाली. पण तिने ते नाकारुन पुढे परीक्षा देणं सुरू ठेवलं. त्यानुसार तिसऱ्या प्रयत्नात पौर्णिमाने यशाला गवसणी घातली आणि तिची थेट महापालिका उपायुक्तपदी निवड झाली. या पदासाठी तिचे यशदा पुणे येथे ट्रेनिंग असणार आहे. विशेष म्हणजे अनुसूचित जमाती मुलींमध्ये राज्यात पहिला येण्याचा मानही मिळवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed