• Sun. Mar 8th, 2026
    कुठे मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज, तर कुठे उष्णतेचा लाटेचा इशारा; पुढील ५ दिवस असं असेल हवामान

    म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : मान्सूनची अरबी समुद्रातील शाखा रविवारीही पुढे सरकली नाही. पश्चिम बंगाल, बिहार, दक्षिण द्वीपकल्पाचा आणखी काही भाग येथे मान्सून येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये प्रगती करू शकतो, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. मात्र रेंगाळलेल्या पावसाने तापमान दिलासा हरवला आहे. भारतीय हवामान विभागाने राज्यात विदर्भासाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. तर, देशात ओडिशा, बिहार, झारखंड, छत्तीसगड, पूर्व उत्तर प्रदेश येथे कमाल तापमानाचा पारा ४२ ते ४४ अंशांदरम्यान असू शकेल, असे स्पष्ट केले आहे. यामुळे पावसाची प्रतीक्षा आणखी तीव्र झाली आहे.

    पावसाअभावी केवळ विदर्भातच नव्हे, तर पूर्ण राज्यातच सरासरीपेक्षा अधिक तापमान नोंदले जात आहे. राज्यात पाऊस दाखल झाल्यापासून १८ जूनपर्यंत कोकणातला मान्सूनचा प्रवास अजूनही पुढे सरकलेला नाही. मध्य महाराष्ट्रात १२ जून रोजी किंचित प्रगती झाल्यानंतर मान्सूनचा प्रवास तिथेच अडकला आहे. कोकण विभागात सरासरीपेक्षा दीड ते साडेतीन अंशांनी कमाल तापमान चढे आहे. हर्णे येथे रविवारी ३.८, तर रत्नागिरी येथे २.९ अंशांनी कमाल तापमान सरासरीपेक्षा अधिक होते. मुंबईत कुलाबा येथे शनिवारपेक्षा १.२ अंशांनी कमाल तापमान वाढले असून रविवारी ३४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हे तापमान सरासरीपेक्षा २.५ अंशांनी अधिक होते. सांताक्रूझ येथे ३३.६ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले असून हे तापमान सरासरीपेक्षा १.७ अंशांनी अधिक होते.

    Mumbai News: वाहतुकीची अडचण मिटणार, गोखले रेल्वे उड्डाण पुल कधी सुरु होणार? महापालिकेनं दिली माहिती

    मध्य महाराष्ट्रात सांगली, सोलापूर, सातारा या जिल्ह्यांमध्येही सरासरीपेक्षा कमाल तापमानात चार अंशांहून अधिक वाढ नोंदली गेली. सोलापूर येथे कमाल तापमान ३८.४ अंश सेल्सिअस होते. मराठवाड्यात बीड, परभणी, उस्मानाबाद, उदगीर येथेही ३८ अंश आणि त्याहून अधिक कमाल तापमानाची नोंद झाली.

    हलक्या सरींचीच शक्यता

    रविवारी दुपारी जाहीर केलेल्या पाच दिवसांच्या जिल्हा पातळीवरील पूर्वानुमानानुसार कोकण विभागात गुरुवारपर्यंत पावसाचा वेग वाढण्याची शक्यता नाही. पालघर, ठाणे, मुंबई येथे २२ जूनपर्यंत हलक्या सरींचाच अंदाज आहे. तर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात मध्यम सरींची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव येथे कोरड्या वातावरणाचीही शक्यता आहे. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी सोमवार, मंगळवारी, तर विदर्भात तुरळक ठिकाणी येत्या तीन-चार दिवसांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

    मुंबईमध्ये फांद्याछाटणीला जोर

    रेंगाळलेल्या पावसामुळे मुंबईमध्ये शनिवार-रविवारी रस्त्यांवरील, इमारतीच्या कुंपणामधील झाडांच्या फांद्याछाटणीला वेग आला. सिमेंट काँक्रिटमुळे उष्णतेचे प्रमाण एकीकडे वाढत असताना या उष्णतेवर नियंत्रण ठेवणारे हिरवे आच्छादन बेसुमार छाटले जात असल्याच्या तक्रारी मुंबईकरांनी नोंदवल्या. गल्ली, इमारतींच्या परिसरातील फांद्या छाटणी करताना अशास्त्रीय पद्धतीने होत असल्याचेही मत मुंबईकरांनी नोंदवले. उंच, डेरेदार वाढलेल्या वृक्षांच्या सावलीत मिळणारा तापमान दिलासाही यामुळे कमी होत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed