पंडित कच्छवे नामक आरोपीची नायगाव तालुक्यातील कोळंबी येथे गोदावरी सिड्स एण्ड बायोटेक नावाची कंपनी आहे. या कंपनीच्या मध्यमातून दरवर्षी बियाणांचा पुरवठा केला जातो. रविवारी देखील कंपनीच्या एका ट्रकातून लाखो रुपयांचे सोयाबीनचे बोगस बियाणे विक्रीसाठी नेत असल्याची माहिती काही जागरूक नागरिकांनी फोनवर कृषी विभागाला दिली. माहिती मिळाल्यानंतर कृषी अधिकारी सुनील वरपडे हे आपल्या पथकासह कोलंबी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी कंपनी बाहेर त्यांना ट्रक आढळून आला. सदर ट्रकची तपासणी केली असता ट्रक मध्ये ३० किलो वजनाचे सोयाबीन असलेले ६९० पोते होते. त्या पोत्यावर गोदावरी सिड्स एण्ड बायोटेक कंपनीच नाव होतं. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करुण जवळपास ५९ लाखाचे बोगस बियाणे आणि ४० लाखाचा ट्रक असं एकूण ९९ लाखाचा मुद्देमाल जप्त केला.
गुण नियंत्रण विभागाच्या तपासणी नंतर गुन्हा दाखल
दरम्यान, कृषी विभागाच्या कारवाई नंतर गुण नियंत्रक विभागाकडून सोयाबीनच्या बियाणाची तपासणी करण्यात आली. तपासणी दरम्यान सदरील बियाणे बोगस असल्याचे निष्पन्न झाले. गुण नियंत्रण विभागाकडून तपासणी अहवाल आल्यानंतर कृषी विभागाने सोमवारी नायगाव पोलीस ठाण्यात गोदावरी सिड्स एण्ड बायोटेक कंपनीचे संचालक पंडित भागोजी कच्छवे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच कृषी विभागाने कंपनीला सील देखील केलं आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे हे करत आहेत.
बोगस बियाणे आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता
मृग नक्षत्रला सुरुवात झाली असली तरी अनेक शेतकऱ्यांनी पूर्वीच बी बियाणे खरेदी केले आहेत. नांदेड जिल्ह्यात सोयाबीन पिकाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनचे बियाणे मोठ्या प्रमाणात खरेदी केले आहेत. मात्र, जिल्ह्यात बोगस बियाणाचा भांडाफोड झाल्यानंतर शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. खरेदी केलेले बियाणे बोगस तर नाही ना? अशी चिंता शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.