• Mon. Sep 14th, 2026

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ग्रेस व आरती प्रभू यांच्या काव्याला अभिवादन – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Mar 18, 2026
सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ग्रेस व आरती प्रभू यांच्या काव्याला अभिवादन – महासंवाद

मुंबई, दि. १८ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने मराठी साहित्यातील अभिजात आणि भावसंपन्न काव्यपरंपरेला अभिवादन करण्यासाठी कवी ग्रेस आणि कवी आरती प्रभू यांच्या काव्यगीतांवर आधारित “मंतरलेल्या शब्दबनात – जेव्हा कवितांची गाणी होतात” या विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी कवितेतील संवेदनशीलता, शब्दांची लय, आशयाची गूढता आणि संगीताची माधुर्यपूर्ण अभिव्यक्ती यांचा संगम घडवून आणणारा हा कार्यक्रम रसिकांसाठी एक संस्मरणीय सांस्कृतिक अनुभव ठरणार आहे.

मराठी साहित्यात कवी ग्रेस (माणिक गोडघाटे) आणि कवी आरती प्रभू (शंकर वैद्य) यांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण आणि भावस्पर्शी लेखनातून आधुनिक मराठी कवितेला एक वेगळी दिशा दिली. त्यांच्या कवितांमध्ये मानवी मनातील सूक्ष्म भावना, एकाकीपणाची जाणीव, निसर्गाचे सौंदर्य, प्रेम, विरह, जीवनातील तत्चचिंतन आणि अस्तित्वाचा शोध या विषयांना अत्यंत प्रभावी शब्दरूप मिळाले. त्यांच्या अनेक कवितांना संगीताची जोड लाभल्यामुळे त्या काव्यगीतांच्या रूपात लोकप्रिय झाल्या असून मराठी रसिकांच्या मनात त्यांना विशेष स्थान प्राप्त झाले आहे. या समृद्ध साहित्यिक वारशाला अभिवादन करण्याच्या उद्देशाने हा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

हा कार्यक्रम मंगळवार, २४ मार्च २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता, मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह, विलेपार्ले, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात कवी ग्रेस आणि आरती प्रभू यांच्या निवडक कवितांवर आधारित काव्यगीतांचे सादरीकरण सुप्रसिद्ध गायकांच्या आवाजात सादर करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमात नचिकेत देसाई, धनश्री देशपांडे आणि विद्या करलगिकर हे गायक काव्यगीतांचे सादरीकरण करणार असून कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रशांत लळित यांनी केले आहे. काव्यवाचन, गीतसादरीकरण आणि संगीताची सुरेल मांडणी यामुळे कार्यक्रम अधिक प्रभावी व रसिकांना भावणारा ठरणार आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने आयोजित हा कार्यक्रम महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत आहे. राज्यातील साहित्य, कला आणि सांस्कृतिक परंपरेचे जतन व संवर्धन करणे, तसेच नव्या पिढीपर्यंत मराठी साहित्याचा समृद्ध वारसा पोहोचविणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

या कार्यक्रमासाठी प्रवेश विनामूल्य असून प्रवेशिका २२ मार्चपासून नाट्यगृहात उपलब्ध राहणार आहेत. मुंबई व परिसरातील साहित्यप्रेमी, कलाकार, विद्यार्थी, सांस्कृतिक संस्थांचे पदाधिकारी तसेच रसिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा व मराठी काव्यपरंपरेचा हा सुरेल आविष्कार अनुभवावा, असे आवाहन श्रीराम पांडे, संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई यांनी केले आहे.

००००

संजय ओरके/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed