राज्यामध्ये १२ जूनपर्यंत सरासरी ५२.८ मिलिमीटर पाऊस पडतो. आत्तापर्यंत केवळ ८.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसाच्या सुरुवातीच्या काळात कोकण विभागात ठाणे आणि पालघर जिल्हा वगळता एकूण पाऊस १०० मिलिमीटरच्या पुढे नोंदला जातो. मात्र कोणत्याही जिल्ह्यामध्ये पावसाची आत्ताची आकडेवारी ५० मिलिमीटरचा टप्पाही गाठू शकलेली नाही.
मुंबई शहरामध्ये १२ जूनपर्यंत सरासरी पाऊस १३१.६ मिलिमीटर नोंदला जातो. मात्र सोमवारी १२ जूनच्या सकाळपर्यंत ही नोंद केवळ ६.३ मिलिमीटर आहे. मुंबई उपनगरांमध्ये १३४.७ मिलिमीटर पावसाची नोंद होते. मात्र उपनगरांमध्येही आत्तापर्यंत केवळ ४.२ मिलिमीटर पाऊस नोंदवला गेला आहे. त्यामुळे शहरात ९५ टक्के, तर उपनगरांमध्ये ९७ टक्के पावसाची तूट आहे.
ठाणे जिल्ह्यातही सरासरी ८८.५ मिलिमीटर पावसाच्या तुलनेत १.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे या जिल्ह्यातही ९८ टक्के पावसाची तूट आहे. मुंबईची तहान भागवण्यासाठी ठाणे जिल्ह्यातील धरणांचा महत्त्वाचा वाटा आहे, हा मुद्दा लक्षात घेतला तर पावसाची तूट पाहता पाणी जपून वापरणे आवश्यक ठरू शकते.
दक्षिण कोकणामध्येही सातत्यपूर्ण पाऊस नसल्याने सिंधुदुर्गात सरासरी पडणाऱ्या २५०.२ मिलिमीटर पावसाच्या तुलनेत केवळ ३७.४ मिलिमीटर पाऊस पडला आहे. तर, रत्नागिरी येथे सरासरी २०० मिलिमीटर पावसाच्या तुलनेत १०.१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. रायगडमध्येही १३५.९ मिलिमीटर सरासरी पावसाच्या तुलनेत १२ जूनपर्यंत ५.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात मान्सून आगमनानंतर शेतकऱ्यांनी शेतीच्या कामांना सुरुवातही केली आहे. मात्र प्रादेशिक हवामान विभागाच्या पूर्वानुमानानुसार दक्षिण आणि उत्तर कोकण दोन्ही विभागांमध्ये १३ ते १६ जून या कालावधीत हलक्या ते मध्यम सरी पडू शकतील. या पार्श्वभूमीवर चक्रीवादळ जमिनीवर आदळल्यानंतर जोरदार पाऊस येईल का, असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
राज्यातील पाऊसतूट (७५ टक्क्यांहून अधिक तूट असलेले जिल्हे)
मध्य महाराष्ट्र
कोल्हापूर – ८९ टक्के
नंदुरबार – ९२ टक्के
सांगली – ७५ टक्के
सातारा – ८४ टक्के
सोलापूर – ९९ टक्के
मराठवाडा (एकूण तूट ८४ टक्के)
बीड – ९० टक्के
हिंगोली – १०० टक्के (अजिबात पाऊस नाही)
जालना – ९८ टक्के
नांदेड – ९२ टक्के
उस्मानाबाद – ९९ टक्के
विदर्भ (एकूण तूट ८१ टक्के)
अकोला – ८५ टक्के
अमरावती – ७९ टक्के
भंडारा – ८२ टक्के
बुलडाणा – ८४ टक्के
चंद्रपूर – ७८ टक्के
गडचिरोली – ९५ टक्के
गोंदिया – ९२ टक्के
नागपूर – ७९ टक्के
वर्धा – ८९ टक्के
