• Sun. Sep 22nd, 2024
जुहू चौपाटीवर ६ मुलं बुडाली, ४ बेपत्ता, दोघांना वाचविण्यात यश

मुंबई : मुंबईतील जुहू चौपाटीवर फिरायला गेलेली ६ मुलं समुद्रात बुडाल्याची घटना घडलीये. यातील दोघांना वाचविण्यात यश आलंय तर चार जण बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु असल्याची माहिती आहे.बिपरजॉय चक्रीवादळामुळे समुद्राला उधाण आलेले असताना मोठमोठ्या लाटा उसळतायेत. अशा स्थितीत पर्यटकांनी समुद्रकिनाऱ्यांवर जाऊ नये, अशा सूचना महापालिकेने पर्यटकांना दिलेल्या होत्या. मात्र तरीही मुलं जुहू चौपाटीवर फिरण्यासाठी गेली. लाटांचा अंदाज न आल्याने मुलं समुद्रात बुडाल्याची माहिती कळतीये.

मुंबईतील जुहू चौपाटीवर फिरण्यासाठी पर्यटक मुले आलेली होती. उधाणलेल्या समुद्राला पाहून ६ मुलं समुद्रात पोहण्यासाठी उतरले. त्याचवेळी जोराची लाट आल्याने तथापि लाटांचा अंदाज न आल्याने सहा मुलं बुडाली. समुद्र किनाऱ्यावरील नागरिकांनी लगेचच धाव घेऊन दोघांना बाहेर काढलं. पण तोपर्यंत चार मुलं बुडाली. सध्या ते बेपत्ता आहेत. अग्निशमन दल आणि मुंबई पोलिसांचं पथक शोधमोहिम राबवत आहेत.

गणपतीपुळे येथे पर्यटक बचावले

बिपरजॉय चक्रीवादळाच्या प्रभावामुळे रत्नागिरी किनाऱ्यावर सध्या लाटांचे जोरदार तांडव सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी गणपतीपुळे तीर्थक्षेत्री आलेल्या अजस्त्र लाटेमुळे पर्यटकासह तेथील विक्रेत्यांना त्याचा फटका बसला होता. रविवारीसुद्धा अशीच अजस्त्र लाट आल्याने पुन्हा एकदा किनाऱ्यावर मोठे नुकसान झाले. लाटेच्या या तडाख्यातून काही पर्यटक अक्षरशः बचावले.

सलग तिसऱ्यांदा हा प्रकार घडला आहे. यापूर्वीही दोनदा गणपतीपुळे मंदिराजवळ पायरीपर्यंत उधाणाचे पाणी आले होते. मात्र रविवारी आलेल्या मोठ्या लाटेने काही दुकानांचेही फार नुकसान झाले. गणपतीपुळे किनाऱ्यावर असलेल्या पर्यटकांची त्यामुळे मोठी तारांबळ उडाली, मात्र सुदैवाने कोणतीही हानी झालेली नाही. या लाटेचा एक व्हिडीओही व्हायरल झाला.

बिपरजॉयचं ‘अत्यंत तीव्र चक्रीवादळा’मध्ये रूपांतर

बिपरजॉय चक्रीवादळाचे रविवारी सकाळी ‘अत्यंत तीव्र चक्रीवादळा’मध्ये रूपांतर झाले आहे. परिणामी, १५ जून रोजी ते गुजरातमधील कच्छ जिल्हा आणि पाकिस्तानमधील कराचीदरम्यान पोहोचण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे हवामान विभागाने सौराष्ट्र आणि कच्छच्या किनाऱ्याला सतर्कतेचा इशारा दिला आहे. ‘पूर्व-मध्य अरबी समुद्रातील ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाने गेल्या सहा तासांत प्रतिकिमी आठ तास वेगाने उत्तर पूर्व दिशेने मार्गक्रमण करताना अतिशय तीव्र रूप धारण केले आहे.

हे चक्रीवादळ सकाळी साडेपाच वाजता मुंबईपासून पश्चिम दिशेला ५५० किमीवर, तर पोरबंदरपासून पश्चिम दिशेला ४५० किमीवर होते. हे चक्रीवादळ १४जूनच्या सकाळपर्यंत उत्तर दिशेकडे मार्गक्रमण करण्याची शक्यता आहे. १५ जून रोजी दुपारी हे चक्रीवादळ गंभीर रूप धारण करून सौराष्ट्र, कच्छ, गुजरातचे मांडवी आणि पाकिस्तानात कराचीच्या सागरी किनाऱ्यावरून जाण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. यावेळी तब्बल १२५ ते १३५ किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed