• Fri. Mar 20th, 2026

    राष्ट्रवादीत मी समाधानी, सुप्रियांचे नाव आपणच सुचवले, अजितदादांचा राजकीय चर्चांना पूर्णविराम

    राष्ट्रवादीत मी समाधानी, सुप्रियांचे नाव आपणच सुचवले, अजितदादांचा राजकीय चर्चांना पूर्णविराम

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांचे नाव जाहीर झाले असल्याने आपण त्याबाबत समाधानी आहोत, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधीमंडळाचे विरोधी पक्षनेता अजित पवार यांनी भूमिका मांडत राजकीय चर्चांना पूर्णविराम दिला. आम्ही सगळ्यांनी मिळून निवडीचा निर्णय घेतला होता. त्यामुळे मला वाईट वाटण्याचा प्रश्नच येत नाही. उलट मीच सुप्रिया सुळे यांचे नाव सुचविले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या २४ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड घोषित करीत पक्षांतर्गत भाकरी फिरविली. पवार यांनी भाकरी फिरविल्याबरोबरच अजित पवारांना पक्षांतर्गत शह देण्याचे राजकारण सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. त्या पार्श्वभूमीवर दिल्लाहून विमानाने पुण्यात परतलेल्या अजित पवार यांना विमानतळावर उतरल्यानंतर विचारले असता त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

    मीच सुप्रिया सुळेंचे नाव सुचविले

    अजित पवार म्हणाले, ‘सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष करण्याचा निर्णय आम्ही यापूर्वीच घेतला होता. त्यामुळे मला वाईट वाटण्याचा प्रश्नच नाही. दिल्ली विमानतळावर माझे विमान होते. म्हणून तेथील मिडियाशी मी बोललो नाही. पण सुप्रियाच्या निवडीबाबत आपण समाधानी आहोत. शरद पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर आमची एक समिती नियुक्त करण्यात आली होती. त्यावेळी आम्ही दोन निर्णय घेतले होते. एक तर साहेबांनी राजीनामा मागे घ्यावा आणि कार्यकारी अध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळेंना घ्या असे मीच सांगितले होते. तेव्हा सगळे म्हणाले, राजीनामा इतकाच मुद्दा मांडा. म्हणून कार्याध्यक्ष निवडीचा विषय मागे राहिला. लोकशाही म्हणून मी गप्प बसलो.’

    Ajit Pawar: शरद पवारांच्या त्या निर्णयाने अजित पवार नाराज?; अजितदादा दिल्लीतून तडक पुण्यात आले आणि बोलले
    ‘हा आमचा पक्षांतर्गत प्रश्न’

    राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदाची निवड जाहीर करताच त्यावर राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या. त्याबाबत विचारता अजित पवार म्हणाले, ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेला आज २४ वर्ष झाली. २४ वर्षांत प्रथमच आपण दिल्लीला गेलो आहोत. कोण कोणाला शह देत नाही. हा आमचा पक्षांतर्गत प्रश्न आहे. इतर कोणी नाक खुपसायचे कारण नाही,’ असे सांगत पवार यांनी विरोधकांना टोला लगावला. ‘पवार साहेब हे एका पक्षाचे राष्ट्रीय नेते आहेत. ते त्यांचं आणि फडणवीस त्यांचे मत व्यक्त करतात. प्रत्येकाला आपापले प्रश्न मांडायचा अधिकार आहे. कोणी काय म्हणाले म्हणून नाराज व्हायचे कारण नाही’, याकडेही त्यांनी माध्यमांचे लक्ष वेधले.
    Pune Loksabha:महाविकास आघाडीत वाद, फडणवीसांनी डाव टाकला; हुकमी नेत्याला दिले तयारीचे आदेश
    महत्त्वाच्या प्रश्नांना बगल

    ‘सध्या जाती धर्मातील तेढ निर्माण करण्याचे प्रकार सुरू आहेत. अनेक प्रश्न समोर आहेत. ते सोडविण्याऐवजी वाचाळवीर बडबडत असतात. महत्वाच्या लोकांबद्दल बोलले की ते मीडिया चालवते. त्यामुळे महत्वाच्या प्रश्नांना बगल देण्याचे काम केले जात आहे’, असे सांगून ‘शहरांची नावे बदलली जात आहे. महापुरुषांसह महिलांची नावे शहराला देण्यात आली आहेत. नावे बदलून प्रश्न सुटणार आहेत का’, असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला. ‘मी नावे बदलण्याच्या विरोधात नाही पण आज जे प्रश्न आहेत त्यात समन्वय साधला पाहिजे’, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

    ‘मला महाराष्ट्रातच रस’

    ‘प्रफुल्ल भाई आणि मी एकाच वर्षी खासदार झालो होतो. सुप्रिया अनेक वर्षे दिल्लीत आहे. मला महाराष्ट्रातील राजकारणात अधिक रस आहे. हे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो. माझ्यावर राज्याच्या विरोधी पक्षाची जबाबदारी आहे. ती मी पार पाडतो आहे’, अशा शब्दांत अजित पवार यांनी आपल्याला राज्याच्या राजकारणातच राहणे पसंत असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed